भामरागड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अभियान ३१ मार्च २०१७ रोजी बंद केले जाणार आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी समायोजन करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एनआरएचएममध्ये अनेक कर्मचारी मागील आठ ते दहा वर्षांपासून काम करीत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे नोकरीसाठी वय निघून गेले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यास त्यांचेवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, या मागणीसाठी एनआरएचएममध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. आंदोलनानंतर भामरागडचे तहसीलदार, पंचायत समिती सभापती, संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन दिले व कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीची जाण करून दिली. निवेदन देतेवेळी डॉ. मडावी मोहीत बुरम, गजभिये, बगमारे, दुधे, खोब्रागडे, वाडणकर, समद्दार, गोंगले, गव्हारे, मडावी, भुरसे, नेते, बन्सोड उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी
By admin | Updated: September 4, 2016 01:57 IST