आरोप : अत्यल्प मानधनावर वाहनचालकांची बोळवण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी कंत्राटी वाहनचालकांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही जि. प. प्रशासन कंत्राटी वाहनचालकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कंत्राटी वाहनचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जि. प. अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा देणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांची केवळ ७ हजार १०० रूपये मानधनावर बोळवण केली जात आहे. वाहनचालकांचे मानधन वाढविण्यासंदर्भात स्थानिक स्तरावरून कुठलीही कार्यवाही अद्याप झाली नाही, असे वाहनचालकांनी म्हटले आहे. त्यामुळे बुधवारपासून वाहनचालकांनी जि. प. समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कंत्राटी वाहनचालकाचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. आरोग्य विभागातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी वाहनचालकांच्या वेतनात दरवर्षी वाढ करण्यात यावी, शासकीय सुट्या व्यतीरिक्त वर्षभरात आठ नैमित्तीक रजा तसेच सात वैद्यकीय रजा देण्यात याव्या, वाहनचालकांचा ईपीएफ कपात करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी वाहनचालकांनी उपोषण सुरू केले आहे. रवी शेट्टे, गुरूदास वाढई व विनोद सांगरे हे तीन वाहनचालक उपोषणाला बसले आहेत. पहिल्या दिवशी उपोषण मंडपात उपोषणकर्त्यांसोबत संदीप मुनगंटीवार, रेमाजी शेंडे, सलीम पठाण, गणेश भोयर, मारोती गोरडवार, रवींद्र गुंढरे, गणेश कुबळे, संतोष मासुरकर, वासनिक, जमीर शेख, आरिफ कुरेशी आदी वाहनचालक उपस्थित होते. दोन दिवस उपोषण मंडपाला अनेकांनी भेट दिली.
कंत्राटी वाहनचालकांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:31 IST