काम प्रगतीपथावर : नागरिकांसाठी सोयीचे; पाठपुराव्याला आले यश मानापूर/देलनवाडी : वैरागडनजीक असलेल्या वैलोचना नदीवर उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. १९८४ साली वैरागड-मानापूर मार्गावर असलेल्या वैलोचना नदीवर पूल बांधण्यात आला. मात्र सदर पूल अत्यंत ठेंगणा होता. थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहत असल्याने आरमोरी, अंगारा परिसरातील गावांची वाहतूक ठप्प पडत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त होत होते. त्यामुळे या ठिकाणी उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने वैलोचना नदीवरील पूल बांधकामाला मंजुरी दिली. सदर पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थी यांना सोयीचे होणार आहे. मानापूर, देलनवाडी परिसरातील अनेक नागरिक आरमोरी येथे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र ठेंगण्या पुलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. पुलाचे काम तत्काळ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
वैलोचना नदीवर उंच पुलाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:16 IST