शून्य प्रहरात अशोक नेते यांची मागणीगडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये गतवर्षी २०१४-१५ च्या हंगामात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच यंदाही धान उत्पादक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र शासनाने उत्पादन खर्चानुसार धानाला हमीभाव द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी लोकसभेच्या अधिवेशनात शुन्य प्रहारात केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सभागृहात मांडली. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच धानाला पुरेसा भाव नसल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे पूर्व विर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. धानाला योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारे धानाला हमीभाव देण्याची घोषणा करावी. जेणे करून खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळेल. धानाला प्रती क्विंटल २ हजार ५०० ते तीन हजार पर्यंतचा हमीभाव देण्यासाठी केंद्र शासनाने तत्काळ पावले उचलावित, अशी विनंती खासदार अशोक नेते यांनी सभागृहात केली. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी सभागृहात पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सभागृहात मांडल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
उत्पादन खर्चानुसार धानाला हमीभाव द्या
By admin | Updated: December 2, 2015 01:16 IST