दिलीप दहेलकर - गडचिरोली
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तके पडत नव्हती. यामुळे अभ्यासक्रम सुरू करण्यास अडचण येत होती. मात्र यावर्षी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सुयोग्य नियोजनामुळे ६ जूनपर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४८ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे पाठ्यपुस्तके पोहोचणार असल्याची माहिती आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित तसेच शासकीय आदिवासी आश्रमशाळा व खासगी अनुदानित शाळांना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता पाठ्यपुस्तके पुरविली जातात. यावर्षीच्या सत्रात ६ जूनपर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४८ शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे नियोजन जि.प. च्या शिक्षण विभागाने केले आहे. याकरीता शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची बैठक घेतली होती. शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जून रोजी पात्र विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक उपलब्ध करण्याच्या हेतुने शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बालभारती प्रकाशनाच्यावतीने जिल्ह्यात पाठ्यपुस्तकाचा पुरवठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ मे पर्यंत अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या दुर्गम तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर दोन ते तीन टप्प्यात उर्वरित तालुक्यात पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहे. स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध होणार बाराही तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, शासकीय तसेच खासगी अनुदानित आश्रमशाळा मिळून एकूण जिल्ह्यातील २ हजार ४८ शाळांसाठी जि.प.च्या शिक्षण विभागाने ३ लाख ६४ हजार ६२७ स्वाध्याय पुस्तीकांची मागणी केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात स्वाध्याय पुस्तीका देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या १ लाख ३६ हजार ४८२ विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तीका मिळणार आहेत.