अहेरीत घेतली बैठक : पोलिसांना सहकार्य करण्याचा झाला निर्णयगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत २०१३ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात बोगस व बनावट आदेशपत्रावर २२० शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १ जूनला गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे शिक्षक दहशतीत आले असून शिक्षकांनी तत्काळ ४ जूनला अहेरी येथे बैठक घेऊन पुढील रणनिती निश्चित केली आहे. चौकशीदरम्यान प्रशासन व पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन अन्यायग्रस्त शिक्षक समितीचे प्रमुख गौतम मेश्राम यांनी या बैठकीत उपस्थित शिक्षकांना केले.बहुचर्चीत २२० शिक्षकांच्या बदली प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीसंदर्भात नस्ती उपलब्ध नसलेल्या ७३ शिक्षकांच्या बदलीचा दस्ताऐवज कार्यालयात नाही, या कारणावरून १ जूनला गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूद्ध ही तक्रार दाखल झाली आहे. पोलीस तपास करून कारवाई करण्याची शक्यता असल्याने शिक्षक धास्तावलेले आहेत. या शिक्षकांनी तत्काळ अहेरी येथील मद्दीवार शाळेत बैठक घेऊन पुढील रणनिती निश्चित केली. यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना अन्यायग्रस्त शिक्षक कृती समितीचे प्रमुख गौतम मेश्राम यांनी सदर बदली प्रकरणी जिल्हा परिषदेने अज्ञात व्यक्तीविरोधात नोंदविलेला एफआयआर हा कार्यालयीन प्रक्रियेचा एक भाग असून शिक्षकांनी मुळीच घाबरून जाऊ नये व दहशतीत राहू नये, प्रशासन व पोलिसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. या बैठकीला १७८ शिक्षक उपस्थित होते. यावेळी अन्यायग्रस्त शिक्षक समितीचे अहेरी तालुकाप्रमुख नंदू चिलवेलवार, तेजराव सुनतकर, पंचपुल्लीवार, सतिश चालुरकर, दिलीप मुपीडवार, विजय बन्सोड, सुनील धात्रक, समर्थ, प्रकाश खोब्रागडे, अहिंसक फुलझेले, ऋषीकेश डोंगरे, चिमुरकर, राहुल गेडाम, देवेंद्र तिम्मा, दामोधर गायकवाड, किशोर बावणे, जगन्नाथ हलामी, खुशाल बोदेले, खरवडे, बापू कोठारी, सलुजा, रोजा, कुंभारे, नंदेश्वर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
तक्रारीने शिक्षक दहशतीत
By admin | Updated: June 7, 2015 01:57 IST