लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना स्पष्ट केले.अहेरी तालुक्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पचे पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) ए.के. मिश्रा यांच्या पत्राने गेल्या आठवडाभरापासून गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनराज्यमंत्री अब्रिशराव आत्राम यांनीही हत्तींचे स्थानांतर होऊ दिले जाणार नाही असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केल्याने कमलापूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.हत्तींना १५ फेब्रुवारीपर्यंत हलवा, असे निर्देश पीसीसीएफ मिश्रा यांनी पत्रात दिले होते. ती मुदत संपल्याने हत्तींना हलविण्याचा निर्णय रद्द झाला का, याबद्दल मिश्रा यांना विचारले असता ते म्हणाले, निर्णय अद्याप रद्द झालेला नाही. हत्तींना हलविण्यासाठी आणखी १५ ते २० दिवसांची मुदत उपवनसंरक्षकांनी मागितली आहे. दरम्यान जनभावना पाहता वनराज्यमंत्र्यांची हत्तींना हलविण्याबाबत नकारात्मक भूमिका असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मंत्रीमहोदयांनी तशी सूचना केल्यास आपला निर्णय मागे घेण्याची तयारी मिश्रा यांनी दर्शविली. मात्र हत्तींना हलविण्याचा निर्णय का घेतला, हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या काळात लाकडांची वाहतूक करण्यासाठी हत्तींचा उपयोग होत होता. पण आता जंगलांची तोडाई बंद आहे. त्यामुळे कमलापूरमध्ये या हत्तींना कोणतेही काम नाही. पेंच प्रकल्पात त्यांना विविध कामे जाऊ शकतात. वाघांचा माग घेण्यासोबतच पावसाळ्यात वनविभागाची कोणतीही वाहने जंगलात वापरू शकत नसताना निगरानीसाठी या हत्तींचा उपयोग होऊ शकतो. त्या ठिकाणी आम्ही पर्यटकांसाठी हत्तींना नेणार नसून आमच्याच कामासाठी नेणार असल्याचे ते म्हणाले. कमलापूरमध्ये हत्ती पाहण्यासाठी कोण पर्यटक येतात? तिथे इतके दिवस हे हत्ती कशासाठी पोसून ठेवले हे मलाच माहित नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.आज नागपुरात अधिकाऱ्यांसोबत बैठकनागपूरमध्ये शुक्रवारी वनराज्यमंत्री अब्रिशराव आत्राम यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. त्यात हत्ती कॅम्पच्या स्थलांतराबद्दलच्या निर्णयावर चर्चा होणार आहे.जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळाली यासाठी आपण कायम प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.दरम्यान हत्तींचे स्थलांतर झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे.काही हत्ती राहू शकतात कमलापुरातप्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या पत्रानुसार कमलापूरच्या सर्वच हत्तींना पेंचमध्ये नेले जाणार आहे. मात्र पर्यटकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी सर्वच्या सर्व हत्ती स्थलांतरित करण्याऐवजी काही हत्ती कमलापुरात ठेवून काही पेंचमध्ये नेण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावरही विचार करता येईल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
- तर कमलापुरातील हत्तीकॅम्प स्थलांतराचा निर्णय रद्द करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या हत्तींचे तिथे आता काम राहिलेले नाही. तिथे कोणी पर्यटकही हत्तींना पाहण्यासाठी येत नाही. मात्र मंत्रिमहोदयांनी सूचना केल्यास हत्तींना तेथून हलविण्याचा निर्णय रद्द केला जाईल, .....
- तर कमलापुरातील हत्तीकॅम्प स्थलांतराचा निर्णय रद्द करणार
ठळक मुद्देपीसीसीएफ मिश्रा यांची स्पष्टोक्ती : हत्ती पाहण्यासाठी पर्यटक येत नसल्याचा जावईशोध