जि.प.मध्ये सत्ता स्थापन करणार : जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ सदस्यांनी दिला गट निर्मितीचा प्रस्ताव गडचिरोली : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार आहे. या दृष्टीकोणातून हालचालींना वेग आला असून मंगळवारी भाजपचे २०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व रासप समर्थीत एक सदस्य मिळून २६ सदस्यांचा गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजप, राष्ट्रवादी युतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष पूर्ण प्रयत्न करेल, असे जाहीर केले होते. मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपच्या पुढाकारातून २६ सदस्यांच्या गट निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यामुळे आता भाजपचा जि.प. सत्तेचा राजमार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत ५१ जागांपैकी भाजपला २०, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला ७ व अपक्ष दोेन व राष्ट्रीय समाज पक्षाला दोन जागा मिळाल्या आहे. कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करावी लागली. दरम्यान सोमवारी गडचिरोली येथे वाकडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला समर्थन देण्यावर एकमत झाल्यानंतर सोमवारी रात्री पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची गडचिरोलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत पाठींब्याच्या शर्ती व अटींवर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक वाटा दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेचा हा समेट झाला. एका अपक्ष सदस्यालाही भाजपने आपल्यासोबत घेत २६ सदस्यांचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता २१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना विचारणा केली असता, प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र तो पूर्ण वाचलेला नाही. सदर प्रस्ताव तपासल्यानंतर आपण पुढील कार्यवाही करू, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या गटनेतेपदी सावंगी-विसोरा क्षेत्रातून निवडून आलेले नानाभाऊ नाकाडे यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती आहे. भाजप व राष्ट्रवादीची ही आघाडी झाल्याने जिल्हाभर मंगळवारी याचीच चर्चा होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून भाजपने हे समीकरण तयार केले, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजप, राष्ट्रवादीचे सूत जमले
By admin | Updated: March 1, 2017 01:34 IST