भामरागडवासीयांची डोकेदुखी : दूरसंचार व वीज सुरळीत करण्यास दुर्लक्षभामरागड : भामरागड तालुक्यात शुक्रवारपासून सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस झाल्याने झाड वीज तारांवर पडून खांब व तारा कोसळलेल्या आहेत. दूरसंचार विभागाच्या भूमीगत लाईनमधील केबलवायर पाणी घुसून उघडे पडले आहे. त्यामुळे दूरसंचार व वीज सेवा ठप्प झाली आहे. मागील पाच दिवसांपासून भामरागड तालुका अंधारात असून अजुनही वीज खांब उचलून विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू झालेले नाही. आणखी पाच दिवस भामरागडमध्ये या दोन्ही सेवा सुरू होण्यास अवधी लागेल, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली आहे. त्यामुळे भामरागडवासीय त्रस्त झाले आहेत. दूरसंचार व वीज महावितरण कंपनीने या भागाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चार दिवसानंतर मंगळवारी पूर ओसरला असून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली. (तालुका प्रतिनिधी)
भामरागड पूर्वपदावर येण्यास पाच दिवस लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 02:32 IST