गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर तळे व विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात वैरण विकास कार्यक्रम राबवून याअंतर्गत ३ हजार ५०० हेक्टरवर मका व ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. हे पीक आता मोठे झाले असून दुष्काळ सदृश्य परिस्थितीतही वावर व शेत हिरवेगार दिसायला लागले आहेत. यावर्षी अगदी सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला. सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला. नियोजित वेळेपेक्षा यावर्षी एक महिनापूर्वीच पावसाने विश्रांती लावली. त्यामुळे धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाचा आटापीटा केला. जवळपास असलेल्या तळे, बोड्यांचे पाणी पूर्णपणे काढून धानपिकाला दिले. पावसाने नियोजित वेळेच्या अगोदरच विश्रांती घेतली व पावसाचे प्रमाण कमी असल्याचा परिणाम म्हणजे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात पीके येतील, अशी पिके घेण्यावर कृषी विभागाने भर दिला. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मका व ज्वारी या दोन पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असलेले बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले. पिकाची पेरणी, किड नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार ५०० हेक्टरवर मका व ज्वारी या दोन्ही पिकांची लागवड केली आहे. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या दोनही पिकांचे उत्पादन घेण्याची २० वर्षाच्या कालावधीतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र त्यानंतर ज्वारीच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात घट होऊन शेतकरी इतर पिकांकडे वळला होता. यावर्षी मात्र ज्वारीचा पेरासुद्धा वाढला आहे. महत्वाचे म्हणजे ही दोन्ही पिके वैरण म्हणूनही वापरता येतात. त्याचबरोबर त्यापासून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० ते ६० हजार रूपयांचे सहज उत्पादन मिळणार आहे. दोन्ही पिकांना पाणी देण्याची अजिबात गरज नसल्याने उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी धान पिकाच्या बांधीतच या पिकांचे उत्पादन घेतले आहे. (नगर प्रतिनिधी)
३,५०० हेक्टरवर बहरला मका व ज्वारी
By admin | Updated: December 11, 2014 23:07 IST