५० ते ६० रूपये किलो : आंब्याच्या चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यासह विविध भागात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आमराया आहेत. यंदा वातावरण अनुकूल असल्याने गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने आंब्याच्या झाडांना मोठा बहर आला आहे. त्यामुळे आमराया आंब्यामुळे झाकाळून गेल्या आहे. ग्रामीण भागातून तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी आणले जात आहे. साधारणत: ५० ते ६० रूपये किलो दराने कच्च्या कैऱ्या (आंबे) विकले जात आहे. १५ ते २० रूपये पाव असा भाव सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्यांची खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. काही शेतकरी आपला आंब्याचा माल व्यापाऱ्यांना विकून मोकळा होत आहे. तर काही शेतकरी स्वत:च दिवसभर शहराच्या ठिकाणी बसून आपल्या आंब्यांची विक्री करीत आहे. त्यामुळे त्यांना जादा भाव मिळत आहे. सध्या बाजारात रसाळ आंब्यांचेही आगमन झाले असून १२० रूपये किलो या दराने हे आंबे विकले जात आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठे व चांगले उत्पादन होण्याची आशा आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
कच्च्या कैऱ्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 01:30 IST