गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील शेतकरी गणपत सातपुते यांनी शेतासभोवताल लावलेल्या कुंपणाला विद्युत प्रवाह लावून ठेवल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला. या प्रकरणात इतरही आरोपींचा समावेश असून त्यानाही अटक करावी, अशी मागणी म्हशींचे मालक गोपाळा बुरांडे यांनी केली आहे.गणपत सातपुते यांनी शेतासभोवताल लावलेल्या कुंपनाने दोन म्हशींचा मृत्यू झाला. म्हशी मरण पावल्यानंतर सदर म्हशी काही दुर अंतरावर नेऊन सातपुते यांच्याच शेतात सातपुते व त्यांच्या साथीदारांनी पुरल्या. प्रत्येक म्हशीचे वजन जवळपास दोन ते तीन क्विंटल एवढे होते. एवढया मोठ्या वजनाच्या म्हशी एकटाच नेऊन पुरू शकत नाही. त्यासाठी किमान पाच ते सहा नागरिकांची गरज भासते. यावरून या प्रकरणात आणखी पाच आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या संशयीत आरोपींची नावे सुचवून त्याना अटक करण्याबाबत चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता सदर तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. असाही आरोप बुरांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात सहभाग असलेल्या इतर पाच आरोपींना अटक करावी अशी मागणी बुरांडे यांनी केली आहे.सातपुते यांच्या शेतात जंगली रानडूकराचे अवशेष आढळून आले आहेत. सविस्तर चौकशी केल्यास या ठिकाणी इतरही वन्य प्राण्यांचे अवेशष आढळून येतील. मात्र वनविभागाचे कर्मचारीही या प्रकरणाकडे कानाडोळा करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी बुरांडे यांनी केली आहे. यावेळी नेताजी गोपाळा बुरांडे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
म्हशींच्या मृत्यू प्रकरणातील इतरही आरोपींना अटक करा
By admin | Updated: April 26, 2015 01:59 IST