आरमोरी : बुधवारी संध्याकाळी आरमोरी तसेच परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गडचिरोलीवरून आरमोरीला होणारा वीज पुरवठा तारांमधील इन्सुलेटर तुटल्याने सायंकाळी ७ वाजतानंतर खंडीत झाला. येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत दुरुस्तीचे काम केले. परंतु सततच्या पावसाचा व्यत्यय आल्याने सकाळपर्यंत त्यांना वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले नव्हते. आरमोरीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुसरा पर्याय वडसावरून वीज पुरवठा घेतल्या जाते. परंतु देसाईगंज येथीलही वीज पुरवठा बंद असल्यामुळे आरमोरीकरांना रात्र अंधारात काढावी लागली. मच्छराचांचा प्रचंड त्रास व उकाडा यामुळे आरमोरीकर रात्रभर त्रस्त झाले. वीज पुरवठा २० तासाहून अधिक काळ खंडीत असल्याने सकाळी होणारा आरमोरी शहराचा पाणी पुरवठाही झाला नाही. बँक तसेच शासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामावरही याच परिणाम झाला. अनेक बँकांचे व कार्यालयांचे व्यवहार आज दिवसभर ठप्प होते. त्यानंतर आरमोरी-गडचिरोली मार्गावरील वीज बिघाड दुरूस्त करून दुपारी २ वाजतानंतर हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. (प्रतिनिधी)
आरमोरी २० तास अंधारात; पाणी पुरवठाही खंडित
By admin | Updated: June 19, 2015 01:37 IST