चार वर्ष लोटले : सुभाषग्राम येथील अंगणवाडी भरते घरातमुलचेरा : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील बालकांना एका घरात बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. सुभाषग्राम येथील अपूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार सदर बांधकाम लाख रूपयाचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या बांधकामाचे कंत्राट जवळच्या एका कंत्राटदाराला दिले होते. संबंधित कंत्राटदाराला पैसा न मिळाल्यामुळे सदर बांधकाम अर्धवट ठेवून संबंधित कंत्राटदार पसार झाल्याची माहिती आहे. सुभाषग्राम हे चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. या गावामध्ये एकमेव अंगणवाडी आहे. लोकसंख्येचा विचार करून सुभाषग्राम येथे आणखी एक अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले. मात्र सदर अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. यामुळे या अंगणवाडी केंद्रातील मुले एका घरी बसून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या संदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीच्या फंडामध्ये पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचे बांधकाम कसे पूर्ण करावे, असा प्रश्न ग्रा.पं. समोर निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण
By admin | Updated: July 3, 2014 23:35 IST