अहेरी : ई- निविदा राबवून रेती घाटांचा लिलाव करण्यात येतो. त्यानंतर कंत्राटदारांमार्फत रेतीचे उत्खनन व वाहतूक केली जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील देवलमरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून बळजबरीने रस्ता बनवून अवैध रेतीची तस्करी व वाहतूक केली जात आहे. प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळणे तर दुरच हा प्रकार सतत सुरूच आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील प्राणहिता नदीच्या घाटावरून रेतीचे उत्खनन व वाहतूक केली जाते. एका रेती तस्कराने देवलमरी येथील बोनगु रामगिरी या शेतकऱ्याच्या मोदूमतुरा येथील शेतीतून रस्ता बनविला. याकरिता रामगिरी या शेतकऱ्याच्या शेतीतील कुंपनाची तोडतोड करण्यात आली. तसेच पिकाची नुकसान संबंधित रेती तस्कराने केली. याबाबत शेतकरी बोनगु रामगिरी यांनी महसूल व पोलीस विभागाकडे तक्रार केली. मात्र त्या रेती तस्कराविरोधात कोणतीही कारवाई अद्यापही करण्यात आली नाही. या प्रकरणी मोका चौकशी बयाण घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अन्यायग्रस्त शेतकरी बोनगु रामगिरी यांनी लोकमतला दिली आहे. अहेरी येथील पोलिसांनी रेती तस्कराविरूध्द कारवाई करावी.
रेती तस्करीसाठी शेतीची नासधूस
By admin | Updated: December 9, 2014 22:50 IST