जनजागृतीचा परिणाम : १४८ नागरिकांना अटल पेन्शनचा लाभगडचिरोली : केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना सुरू केले आहेत. या दोन्ही योजनांबाबत जनतेत केंद्र, राज्य व बँक प्रशासनाच्या मार्फतीने व्यापक प्रमाणात जागृती करण्यात आली. त्यामुळे या दोन विमा योजनांचा लाभ ५७ हजार २११ नागरिकांनी घेतला आहे. यामध्ये ३५ हजार ८४३ नागरिकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व २१ हजार ३६८ नागरिकांनी पंतप्रधान जीवन ज्योती योजनेचा लाभ घेतला आहे.
३५ हजार ८४३ नागरिकांचा पंतप्रधान सुरक्षा विमा
४पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम केवळ १२ रूपये आहे. या योजनेंतर्गत १८ ते ७० वयाच्या नागरिकांचा विमा काढता येतो. विमा काढल्यानंतर सदर व्यक्तीचे अपघातात जखमी झाल्यास त्याला एक लाख रूपयांची मदत दिली जाते. जर त्याचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला दोन लाख रूपये दिले जातात. अत्यंत कमी खर्चात या योजनेचा लाभ मिळत असल्याने सर्वाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्हाभरातील विविध राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेत सुमारे ३५ हजार ८४३ नागरिकांनी या योजनेंतर्गत स्वत:चा विमा काढून घेतला आहे. सर्वाधिक विमे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेमध्ये काढण्यात आले आहेत. बँक आॅफ इंडियाने ४ हजार ९४४ विमा काढला आहे.
२१ हजार नागरिकांना जीवन ज्योती योजनेचे संरक्षण
४या योजनेंतर्गत वार्षिक हप्ता ३३० रूपये भरावा लागतो. या योजनेचा लाभ १८ ते ५० मधील नागरिकांना घेता येते. मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांंची भरपाई दिली जाणार आहे. बँकेचे खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे असा राहणार आहे. विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित विमाधारकाचा अर्ज ३१ मे पर्यंत बँकेकडे येणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २१ हजार ३६८ नागरिकांनी विमा काढला आहे. सर्वाधिक विमा स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ४ हजार ३७९ नागरिकांनी काढले आहेत. बँक आॅफ इंडियामध्ये ३ हजार ५२६, बँक आॅफ महाराष्ट्रामध्ये ४ हजार ३३४, सहकारी बँकेने ३ हजार ९८४ नागरिकांचा विमा काढला आहे.
अटल पेन्शनला अत्यल्प प्रतिसाद
४माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत ४२ रूपयांपासून २१० रूपयांपर्यंतची दरमहा गुंतवणूक करता येते. वयाच्या ६० वर्षानंतर संबंधित व्यक्तीला किमान १ हजार ते ५०० हजार रूपयांपर्यंत वार्षिक पेन्शन दिल्या जाते. या योजनेंतर्गत वयानुसार रक्कम भरायची आहे. जेवढी जास्त रक्कम भरली जाईल, तेवढी पेन्शन जास्त मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्हाभरातील १४८ नागरिकांना मिळणार आहे. सर्वाधिक पेन्शनचे नामांकन बँक आॅफ इंडियामधून करण्यात आले आहे. या बँकेतून १०४ नामांकन भरण्यात आले आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये सहा, बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये २२, आयडीबीआय बँकेत १५ व कॅनरा बँकेत एका नागरिकाने नामांकन भरले आहे. इतर योजनांच्या तुलनेत या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.
५७ हजार नागरिकांना मिळाले विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 01:26 IST