देसाईगंज : संत निरंकारी मंडळाच्या वतीने आरमोरी मार्गावर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ४११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी स्वत: रक्तदान करून उपक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष शाम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, गटनेता किसन नागदेवे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, संतोष शामदासानी, नसरूद्दीन भामानी, कोरचीचे नगराध्यक्ष कमल खंडेलवाल, उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, विलास साळवे, महेश पापडकर, शरद मुळे, करूणा गणवीर, आशा राऊत, बबलू हुसैनी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५५० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणावरून अनेकांनी रक्तदान केले नाही. देसाईगंज येथील सिंधी समाजाच्या वतीने निरंकारी मिशनचे बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होणारे हे पहिलेच रक्तदान शिबिर असल्याने या उपक्रमांची प्रसंशा करण्यात आली. शिबिरादरम्यान ३४२ पुरूष व ६९ महिलांनी रक्तदान केले. निरंकारी मंडळाच्या वतीने उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसंक्रमण पेढीचे अधिकारी, ग्रामीण रूग्णालय देसाईगंज, उपजिल्हा रूग्णालय आरमोरी, कुरखेडा, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड, आष्टी, कोंढाळा येथील कर्मचारी तसेच संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून तसेच इतर हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. सर्वाधिक रक्तदान करणारे हे जिल्ह्यातील एकमेव मंडळ आहे. मंडळाच्या या सेवाभावी वृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे. अशा प्रकारचे उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी राबवावे, अशी आशा सुध्दा व्यक्त करण्यात येत आहे.
देसाईगंज येथे ४११ जणांनी केले रक्तदान
By admin | Updated: April 30, 2016 01:21 IST