कृषी निविष्ठांचे व्यवहार : काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात खते, बियाणे, कीटनाशके व तत्सम कृषी निविष्ठांच्या व्यवहारात गैरप्रकार होऊ नये, याकरिता कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्तेवर तसेच व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांची नजर कृषी केंद्र संचालकांवर राहणार आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामातील पीक लागवड व नियोजन आराखडा कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानासह इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खताची एकूण २८० नोंदणीकृत परवानाप्राप्त कृषी केंद्र आहेत. तर २३६ कृषी केंद्र कीटकनाशक विक्रीची आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठाचे नमूना लक्षांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. यामध्ये बियाणे ५९० क्विंटल, रासायनिक खते ३९४ मेट्रीक टन इतका समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या कृषी निविष्ठाचे गावपातळीवर संयनियंत्रण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सन २०१७-१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे व गुणवत्तेचे कृषी निविष्ठा प्राप्त होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर १ व जिल्हास्तरावर १ अशा एकूण १३ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या कृषी निविष्ठाच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक व जिल्हास्तरावर एक यानुसार १३ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. खरीप पिकांच्या क्षेत्राची टक्केवारी ८६ आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर ही पिके प्रामुख्याने अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा या तालुक्यात घेतली जातात. गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १५०१ मिमी असून गतवर्षी सन २०१६-१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५०.११ मिमी म्हणजे १०९.६८ टक्के पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १.७३ लाख हेक्टर असून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ०.२८ लाख हेक्टर तर उन्हाळी धानपिकाचे क्षेत्र ०.०२५ लाख हेक्टर इतके आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात २.०६ लाख हेक्टर क्षेत्रात धानासह इतर पिकांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. तर रब्बी पिकांची ०.२२ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. ६८८ मृद आरोग्य पत्रिका तयार शेतजमिनीतून भरघोस उत्पादन येण्यासाठी जमिनीचे माती परिक्षण तथा मृद सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मृद चाचणीसाठी नमूने घेतली जातात. सन २०१६-१७ या वर्षात सर्वसाधारण, सूक्ष्म, विशेष व पाणी नमूने मिळून एकूण १४ हजार ८५० नमूने तपासण्याचे लक्षांक देण्यात आले होते. यापैकी एकूण ६८८ नमून्याची तपासणी करण्यात आली व तेवढ्याच आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. मृद चाचणीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्य, जस्त, लोहा, जमिनीची सुपिकता आदींची तपासणी करण्यात आली.
१३ दक्षता पथकांची राहणार नजर
By admin | Updated: May 13, 2017 02:11 IST