खासगी संस्थांच्या शाळा : आॅनलाईन पद्धतीने मागविली होती माहिती गडचिरोली : खासगी शैक्षणिक संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे. यामध्ये जिल्हाभरातील १२६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांत शासनाने गल्लोगल्ली शाळांना मान्यता दिली आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी संस्थांच्या शाळासुद्धा उघडण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागामध्येही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. एकंदरीतच शाळांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्या तुलनेत मागील काही दिवसांपासून लोकसंख्या स्थिर आहे. शासनाच्या शाळांच्या तुलनेत पालकवर्ग इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य देत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे शासनाच्या शाळांची पटसंख्या घटून तुकड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये ५०० पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हीच परिस्थिती खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थांचीसुद्धा झाली आहे. या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत, अशा शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शासनाने माहिती मागितली होती. ही सर्व माहिती आॅनलाईन पद्धतीने मागितली होती. त्यासाठी शासनाने ‘समायोजन पोर्टल’ निर्माण केले होते. अतिरिक्त शिक्षकांची माहिती संबंधित संस्थांनी समायोजन पोर्टलवर भरायची होती. गडचिरोली जिल्ह्यात खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक अनुदानित १४६ शाळा आहेत. या शाळांमधील ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर प्राथमिक शाळांमधील ११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्हाभरात खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या ३१ प्राथमिक शाळा आहेत. या शिक्षकांकडून २० आॅगस्टपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. या आक्षेपानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २२ आॅगस्ट रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर २४ व २५ आॅगस्ट रोजी समायोजन केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी) पाच संस्थांनी माहितीच भरली नाही मंजूर पदे व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती आॅनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर देण्यात आली होती. मात्र जिल्हाभरातील पाच संस्थांनी स्वत:हून माहिती भरली नाही. काही संस्थांमधील व्यवस्थापनात भांडणे आहेत. त्यामुळे या संस्थांनी माहिती भरली नाही. अशा संस्थांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत:च्या लॉगईनवरून भरली आहे. २४ व २५ आॅगस्टला समायोजन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे २४ व २५ आॅगस्ट रोजी समायोजन केले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन राहणार आहे. पहिल्या फेरीत सदर शिक्षकांचे सेवा ज्येष्ठतेनुसार संबंधित जिल्ह्यातच समायोजन केले जाणार आहे. पहिल्या फेरीत ज्या शिक्षकांचे समायोजन झाले नाही, अशा शिक्षकांचे दुसऱ्या फेरीत समायोजन केले जाणार आहे. दुसऱ्या फेरीतही ज्या शिक्षकांचे समायोजन होणार नाही, त्यांच्यासाठी तिसरी फेरी राबविली जाणार आहे. माध्यमिकमध्ये केवळ १५ जागा रिक्त खासगी संस्थांच्या मार्फतीने सर्वाधिक माध्यमिक शाळा चालविल्या जातात. जिल्हाभरात एकूण १४६ शाळा आहेत. यामधील ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर केवळ १५ जागा जिल्हाभरात शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित १०० शिक्षकांचे विभागीय स्तरावरील इतर जिल्ह्यांमध्ये समायोजन करावे लागणार आहे. विभागीय स्तरावरही समायोजन न झाल्यास राज्यस्तरावर समायोजन केले जाणार आहे. रिक्त जागा कमी व अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक, अशी परिस्थिती राज्यभरातच आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे नेमके समायोजन करायचे कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. मागील वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यभरातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या शिक्षकांना काम न करताच कोट्यवधी रूपये वेतन देण्याची पाळी शासनावर आली आहे.
१२६ शिक्षक अतिरिक्त
By admin | Updated: August 19, 2016 00:48 IST