नक्षल सप्ताहाला टक्कर : नऊ उपविभागीय स्तरावर कार्यक्रम, शेतीबाबत माहिती, आरोग्य तपासणी व विविध क्रीडा स्पर्धागडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी ५ ते ११ आॅक्टोबर दरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व बंद पुकारला होता. मात्र गडचिरोली पोलिसांनीसुध्दा खबरदारी आणि सतर्कता म्हणून विशेष रणनीती आखली. या कालावधित पोलिसांनी आदिवासी बांधवांसाठी ‘जनमैत्री’ मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे नक्षलवाद्यांचा हा सप्ताह पूर्णपणे ‘फ्लॉप-शो’ ठरला. गडचिरोली जिल्ह्यात ९ उपविभागीय स्तरावर पोलिसांच्या वतीने तीन दिवसीय निवासी जनमैत्री मेळावे घेण्यात आले. यात अतिदुर्गम भागातील १ हजार २५६ आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला.पोलिसांच्या आक्रमकतेमुळे जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांना हिंसक प्रकार घडवून आणता आले नव्हते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात ५ ते ११ आॅक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व बंदचे आवाहन केले होते. नक्षलवाद्यांच्या आवाहनाला आता स्थानिकांचा प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. तरीसुध्दा स्थानिकांच्या मदतीने शासनाच्या विरोधात प्रचार, प्रसार, विध्वंसक घटना, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी प्रकार नक्षलवाद्यांकडून केले जातात. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी अभिनव रणनीती आखली. स्थानिक पातळीवरील एआरडी, जीआरडी, मिलीशिया यांना एकत्र आणून पोलिसांनी त्यांच्यासाठी ८ ते १० आॅक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी जनमैत्री मेळावे घेतले. विशेष म्हणजे आतापर्यंत जी मंडळी या सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांची पत्रके गावागावात वाटत होती, ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. गडचिरोलीतील जनमैत्री मेळाव्यात ९० आदिवासी बांधव, कुरखेडा येथे १६४, पेंढरी १५७, धानोरा १३५, एटापल्ली १६०, जिमलगट्टा १४५, भामरागड १६०, सिरोंचा ११० आणि अहेरी येथील जनमैत्री मेळाव्यात १३५ अशा एकूण १,२५६ नागरिकांचा समावेश होता. मेळाव्यात सहभागी ग्रामस्थांकरीता सकाळी योगा व प्राणायामचे विशेष वर्ग घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आरोग्य व परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सोबतच नागरिकांना शेतीविषयक समस्या व त्याचे निराकरण, महसूल विषयक माहिती, पेसा कायदासंदर्भात मार्गदर्शन व ग्रामसभेच्या अधिकाराबाबत माहिती देण्यात आली. कबड्डी व व्हॉलीबॉल यासारख्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)मेळाव्यात सहभागी झालेल्या नागरिकांकडून आपापल्या परिसरात विकासासाठी काय करायला पाहिजे, शेतीविषयक उत्पादन, धानाची परिस्थिती यावरसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात प्रधानमंत्री विमा योजना, बँक खाते उघडणे, विमा काढणे, आर्थिक समृद्धीसाठी स्थानिक वनोपजांचा उपयोग, तेंदूपत्ता कटाई, बांबू कटाई, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पथनाट्य, रेला नृत्य व आदिवासी संस्कृतीवर आधारित चित्रपटही दाखविण्यात आले.
जनमैत्री मेळाव्यात १,२५० नागरिकांचा सहभाग
By admin | Updated: October 16, 2016 01:00 IST