गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली झालेल्या सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांना कार्यमूक्त करण्यात आले असून त्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सभागृहात १३ मार्च रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सचिन इंगळे, रवींद्र पारखे, पंकज कांबळे, कोळी यांनी आपले मनोगत व प्रत्यक्ष अनुभव कथन केले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ज्या अधिकाऱ्यांकडे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करण्याचा अनुभव आहे, असे पोलीस अधिकारी राज्याच्या इतर कोणत्याही भागात काम करण्यास मागे हटणार नाही. येथील अनुभवांची गाठोळी जीवनभर साथ देईल, असे मार्गदर्शन केले.पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान प्रत्येकाला स्वत:ला कामात झोकून द्यावे, असे सांगितले. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यावर असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे, संचालन पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील व तेजस्वी पाटील तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
१०१ पोलीस उपनिरीक्षकांना निरोप
By admin | Updated: March 16, 2015 01:19 IST