'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये का दिसले नाही? भाऊ कदम म्हणाले- "मजा आली नसती..."
By कोमल खांबे | Updated: May 5, 2026 16:57 IST2026-05-05T16:57:08+5:302026-05-05T16:57:44+5:30
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात का दिसले नाहीत? यामागचं कारण एका मुलाखतीत बोलताना भाऊ कदमने सांगितलं आहे. निलेश साबळे नसल्याने मीदेखील नकार दिल्याचा खुलासा भाऊने केला आहे.

'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये का दिसले नाही? भाऊ कदम म्हणाले- "मजा आली नसती..."
'चला हवा येऊ द्या' हा मराठी टेलिव्हिजनचा सगळ्यात गाजलेला शो. या शोचं दुसरं पर्व काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. मात्र या शोमध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसले नाहीत. 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात का दिसले नाहीत? यामागचं कारण एका मुलाखतीत बोलताना भाऊ कदमने सांगितलं आहे. निलेश साबळे नसल्याने मीदेखील नकार दिल्याचा खुलासा भाऊने केला आहे.
भाऊ कदमने 'सागर खापरे अरे बापरे' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत भाऊ म्हणाला, "निलेश साबळे मला खूप मानतो. तो माणूसच गोड आहे. कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. त्याचं कामावर खूप प्रेम आहे. तो नेहमी कामात व्यस्त असतो. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी असतो. आणि जर निलेश साबळे असेल तरच मीही काम करतो. चला हवा येऊ द्या नंतर बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला होता. तीन महिने कार्यक्रम बंद ठेवणं आम्हाला चालणार होतं. पण, ७-८ महिने कार्यक्रम बंद करून चालणार नव्हता. कारण, आम्हाला घर वगैरे चालवायचं असतं. त्यामुळे हे मला आणि निलेशला दोघांनाही परवडणारं नव्हतं".
"पण, शेवटी दुसरा सीझन सुरू करायला ७-८ महिने गेले. तेव्हा साबळेने नकार दिला. निलेश साबळे नाही म्हणून मग मी पण नकार दिला. कारण शो लिहिणारच नाही म्हणाला. मी गेलो असतो, काम केलंही असतं...पण ती मजा मला आली नसती. कारण, त्याने जे करून ठेवलंय ते स्टँडर्ड जपणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या परिने शो चांगला केला. पण, निलेश साबळे असता तर चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये मी काम केलं असतं", असा खुलासाही भाऊने केला.