Smriti Irani : गरोदर असताना केलं रिप्लेस, मेकअपमनंही म्हटलं होतं, “मला लाज वाटते..,” स्मृती इराणींनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 08:38 AM2023-03-27T08:38:40+5:302023-03-27T09:01:46+5:30

स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीदरम्यान जुन्या आठवणींना दिला उजाळा.

'क्योंकी सांस भी कभी बहू थी' ही मालिका माहित नाही असं कोणीच नसेल. घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) 'तुलसी' या भूमिकेमुळे लोकप्रिय झाल्या होत्या.  

सात वर्ष त्यांनी मालिकेत काम केलं. मात्र इतक्या वर्षात त्यांना जितकी लोकप्रियता मिळाली तितकेच वाईट अनुभवही आले. हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव त्यांनी नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. गीतकार नीलेश मिश्रा (Nilesh Mishra) यांना दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी मालिकेच्या शूटदरम्यानचे अनेक किस्से, आठवणी सांगितल्या. 

'क्योंकी सांस भी कभी बहू थी'च्या नव्या सेटवर निर्मात्या शोभा कपूर यांनी सेटवर कोणीही जेवणार नाही असा नवा नियम केला होता. फर्निचरचे नुकसान होण्याची भीती होती, असं स्मृती इराणी यांनी सांगितलं.

तुम्ही स्टारसारखे दिसत नाही, त्या प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही एका वर्करसारखे दिसता. मला दररोज १८०० रुपये मिळायचे. झुबीन आणि माझा विवाह झाला तेव्हा आमच्याकडे तीस हजार रुपये होते. मला आठवतंय की माझ्या मेकअपमनलाही लाज वाटत होती. तो नेहमी म्हणायचा – कार घ्या, मला लाज वाटते, मी कारमध्ये येतो आणि तुलसीभाभी ऑटोत येतात, असा किस्साही त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितला.

“क्योंकी सास भी.. या मालिकेतून अचानक मला बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी मी गरोदर होते. गरदोरपणात अखेरच्या दिवसापर्यंत मी गौतम अधिकारी यांच्या शो साठी शूट करत होते. मी तो शो होस्ट करत होते आणि आम्ही एपिसोड बँक तयार करत होतो. मला नंतर पूर्ण सुट्टी हवी होती म्हणून मी अखेरच्या दिवसापर्यंत शूट केलं,” असंही त्या म्हणाल्या.

“एका महिन्यानंतर जेव्हा मी परत आले तेव्हा मला सांगितलं की तुम्हाला काढून टाकण्यात आलंय. मीता वशिष्ठनं मला रिप्लेस केलंय असं मला दुसऱ्या दिवशी समजलं. हे जास्त चालणार नाही, कारण मी शो लिहित होते, असं त्यांना सांगितलं. परंतु माझं ऐकलं नाही आणि लवकरच तो शो बंद झाला,” अशी आठवण स्मृती इराणी यांनी सांगितली.

 त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मुंबईतील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये क्लिनर म्हणूनही काम केलं, ज्यासाठी त्यांना महिन्याला १५०० रुपये मिळायचे. जेव्हा स्मृती यांची मिस इंडियासाठी निवड झाली. मात्र सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. तेव्हा स्मृती इराणी यांनी वडिलांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र पैसे देण्याऐवजी वडिलांनी स्मृती इराणींसमोर एक अट घातली, होती असंही त्यांनी सांगितलं.

मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या की, वडिलांनी सांगितले होते- मी तुला पैसे देईन, पण अट अशी आहे की तुला मला व्याजासह पैसे परत करावे लागतील. जर तू पैसे परत करू शकली नाहीस तर मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करून देईन. वडिलांची ही अट स्मृतींनी मान्य केली होती.

स्मृती इराणी यांनी सांगितलं की, सौंदर्य स्पर्धेतून मिळालेल्या भेटवस्तूंमधून ६० हजार रुपये वडिलांना परत केले होते, परंतु उर्वरित पैसे परत करण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागलं. त्यांनी काही जाहिराती केल्या, पण तरीही त्यांना मजबूत उत्पन्नाचा स्रोत हवा होता. यावेळी त्यांनी क्लीनर म्हणून काम केलं.