CID च्या ACP प्रद्युम्न यांची 'प्यारवाली लव्ह स्टोरी', पत्नीसाठी जे केलं त्याचं करावं तितकं कौतुक कमीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 09:12 AM2023-04-20T09:12:10+5:302023-04-20T09:45:37+5:30

शिवाजी साटम आज 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

कुछ तो गडबड है दया..! हा टेलिव्हिजनवरचा डायलॉग भलताच गाजला होता. सीआयडी या लोकप्रिय मालिकेत एसीपींची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यामुळे घराघरात पोहोचले. आजही त्यांना एसीपी प्रद्युम्नय याच नावाने ओळखलं जातं.

सीआयडी या मालिकेने 21 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यातील एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत हे पात्र गाजले. वेगवेगळ्या केस उलगडताना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी केले. या कलाकारांना मालिकेने ओळख दिली.

तर मालिकेतील मुख्य अभिनेते शिवाजी साटम आज 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शिवाजी साटम यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप कमी जणांना माहित असेल. त्यांची लव्हस्टोरी आणि आलेले अडथळे याबद्दल जाणून घेऊया.

शिवाजी साटम यांची लव्हस्टोरी ऐकली तर तुम्हाला वाटेल त्याकाळी असंही व्हायचं काय. चेहऱ्यावरुन गंभीर दिसणारे हे अभिनेते खऱ्या आयुष्यात खूपच रोमँटिक होते. त्यांची पत्नी अरुणा साटम यांचं 23 वर्षांपूर्वी निधन झालं. यानंतर दुसरं लग्न न करता आजही ते पत्नीच्या आठवणीत जगत आहेत.

शिवाजी आणि अरुणा साटम हे अतिशय रोमँटिक कपल होतं. त्यांची जोडी बघूनच वाटायचं की यांचा प्रेमविवाह असणार. मात्र तसं नव्हतं. त्यांचं अरेंज मॅरेज झालं होतं. त्यांच्या पत्नी अरुणा साटम या 70 च्या दशकातही अगदी मॉडर्न होत्या. तर शिवाजी हे अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले.

शिवाजी साटम यांचे वडील जिमनॅस्ट होते. तसेच ते कुस्तीही खेळायचे. तर त्यांची बहीणही अॅथलिट होती. त्यांच्या वडिलांनीच शिवाजी यांच्यासाठी अरुणाचे स्थळ सुचवले. दोघंही एकमेकांना पसंत पडले.

अरुणा साटम या महाराष्ट्र कबड्डी टीमच्या कॅप्टन होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी अवॉर्डही मिळाला होता. नंतर त्यांनी कोचिंगही केले. शिवाजी म्हणतात,'कायमसाठी नाही पण 24 वर्षांची तरी आमची साथ राहिली.'

दरम्यान अरुणा यांना कॅन्सरचे निदान झाले. ७ वर्ष त्यांच्यावर उपचार चालले. तो काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. तेव्हा मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी त्यांची मदत केली. 'गुलाम ए मुस्तफा' सिनेमाच्या शूटिंगवेळी सहकलाकार नाना पाटेकर आणि अरुणा इरानी यांनी कुटुंबासारखीच साथ दिली.

मात्र एक दिवस अरुणा यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. यानंतर शिवाजी साटम यांनी स्वत:ला कामात झोकून दिलं. नायक, वास्तव, गुलाम ए मुस्तफा, हु तू तू, सूर्यवंशम अशा सिनेमांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी काही सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांना अभिजीत साटम हा मुलगा आहे. अभिजीतने मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकरसोबत लग्न केले आहे.