"तेवढ्यात त्याने मला पकडलं अन् जोरात..."; नेहा पेंडसेने सांगितला मुंबईतला भीतीदायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:29 IST2026-04-24T13:45:55+5:302026-04-24T14:29:42+5:30
मी माझी किल्ली शोधतेय असं म्हणत मी तिथून पळून गेले..., नक्की काय घडलेलं?

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे वयाच्या ५ व्या वर्षापासूनच काम करत आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली.

नेहा मराठीच नाही तर हिंदीतही लोकप्रिय आहे. 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेने तिला प्रसिद्धी दिली. मराठी सिनेमा, हिंदी शोज यामुळे ती कायम चर्चेत राहिली. २०१८ साली ती ' हिंदी बिग बॉस'मध्येही दिसली. सध्या ती 'तिघी' या मराठी सिनेमामुळे चर्चेत आहे.

नेहा पेंडसेने नुकताच तिला मुंबईत आलेला भयानक अनुभव सांगितला. काही वर्षांपूर्वी अंधेरीतील रस्त्यावर तिच्यासोबत एका माणसाने गैरवर्तन केलं होतं

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत नेहा पेंडसे म्हणाली, "मी जेव्हा अंधेरीत राहत होते तेव्हा लोखंडवाला बॅक रोडवर जॉगिंगला जायचे. मी कायमच सकाळी लवकर उठणारी व्यक्ती आहे."

"पहाटेचे सव्वा पाचच वाजले होते. सूर्योदय झाला नव्हता. समोरच्या बाजूने कारमधून एक माणूस आला आणि त्याने मला एक पत्ता विचारला. 'इथून कसं जायचं?' असं तो विचारत होता."

"त्याने अतिशय हळू आवाजात विचारलं त्यामुळे मला तो काय विचारतोय हे ऐकू आलं नाही. त्याचं म्हणणं ऐकायला मला त्याच्या जवळ जावं लागलं. तेवढ्यात त्याने मला पकडलं आणि जोरात गाडी पुढे नेली."

"मी तेव्हा खूप रिअॅक्टिव्ह होते. माझ्या हातात माझ्या क्रूझ कारची किल्ली होती. मी जोरात त्याच्या गाडीवर ती किल्ली मारली आणि ती त्याच्या कारच्या मागच्या काचेवर लागली."

"तितक्यात त्याने जोरात ब्रेक लावला. तेव्हा मात्र मला भीती वाटली. आता हा माणूस ब्रेक मारुन थांबलाय आणि आजूबाजूला कोणीच नाहीये, जर याने कार मागे घेतली आणि मला काही केलं तर मी स्वत:ला कशी वाचवू शकणार होते."

"पण तो काही सेकंदच थांबला. काचेला फार काही झालं नाही हे त्याने पाहिलं आणि वेगात निघून गेला. ते काही सेकंद मात्र माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात भीतीदायक वेळ होती. मला नक्की काय घडलं हे समजतच नव्हतं. मी स्तब्ध झाले होते."

"हळूहळू इतर लोक फिरायला यायला लागले आणि मला पाहून त्यांना काही कळेना. 'हिला काय झालं' असं त्यांना वाटलं. मी नियमित जॉगिंगला जायचे त्यामुळे अनेक लोक मला चेहऱ्याने ओळखत होते. त्यामुळे मला पाहून त्यांनाही प्रश्न पडला. मला कोणाशीच नजरही मिळवायची भीती वाटत होती. मी माझी किल्ली शोधतेय असं म्हणत मी तिथून पळून गेले."

















