'बॉर्डर' जर सैनिक असेल तर 'संदेसे आते है' त्याची वर्दी आहे, सोनू निगमचं जावेद अख्तर यांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:07 IST2026-01-25T11:06:35+5:302026-01-25T11:07:23+5:30
सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत त्याचं मत व्यक्त केलं आहे.

'बॉर्डर' जर सैनिक असेल तर 'संदेसे आते है' त्याची वर्दी आहे, सोनू निगमचं जावेद अख्तर यांना उत्तर
'धुरंधर' सिनेमा गाजल्यानंतर आता बी टाऊनमध्ये 'बॉर्डर २'ची हवा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत. बॉर्डर हा फक्त सिनेमा नाही तर ती देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी हा सिनेमा खास आहे. १९९७ साली पहिला 'बॉर्डर' आला होता. त्यातलं 'संदेसे आते है' गाणं आजही तितकंच लोकप्रिय आणि भावुक करणारं आहे. सोनू निगमने हे गाणं गायलं होतं तर जावेद अख्तर यांनी ते लिहिलं होतं. आता 'बॉर्डर २'साठी जुनं गाणं पुन्हा लिहिण्याची ऑफर जावेद अख्तर यांना मेकर्सने दिली. मात्र त्यांनी असं करण्यास नकार दिला. त्यांना जुनं गाणं पुन्हा लिहिण्यात काहीच क्रिएटिव्हिटी वाटत नव्हती. आता सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत त्याचं मत व्यक्त केलं आहे.
सोनू निगम व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "बॉर्डर एक अशी फ्रँचायझी आहे ज्यात खऱ्या कहाण्या आहेत. काल्पनिक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत. या आपल्या देशातील सैनिकांच्या गोष्टी आहे. त्यांच्या यशाच्या गोष्टी आहेत. सिनेमाकडून तुमच्या आशा आकांक्षा खूप असतील आणि असल्याच पाहिजे कारण ही फ्रँचायझीच अशी आहे. आपल्या निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी अतिशय मनाने हा सिनेमा बनवला आहे. आम्ही याच्या संगीतावरही लक्ष दिलं आहे. जे युद्ध आपण काही वर्षांपूर्वी जिंकलो होतो ते बॉर्डर २ च्या माध्यमातून पुन्हा एकदा जिंकू."
तो पुढे म्हणाला, "हो, जावेद साहेब बरोबरच म्हणाले की जुन्या गाण्यांना पुन्हा नव्या अंदाजात गाणं हे योग्य नाही. पण काय करणार? बॉर्डर जर सैनिक असेल तर संदेसे आते है ही त्याची वर्दी आहे. त्याशिवाय बॉर्डरची कल्पना कशी करायची? जावेद साहेबांचं योग्यच आहे की आपल्याला नवी गाणी हवीत. ते आमचे गुरु आहेत. ते मोठे आहेत. त्यांना हे ऐकून आनंद होईल की मिट्टी के बेटे हे गाणं बॉर्डर २ चं सर्व सैनिकांना आणि देशवासियांना मिळालेलं गिफ्ट आहे."