'राजा शिवाजी'साठी एकही रुपये मानधन का घेतलं नाही? अभिषेक बच्चनने सांगितलं खरं कारण, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:28 IST2026-05-11T13:25:55+5:302026-05-11T13:28:11+5:30
'राजा शिवाजी' चित्रपटासाठी मानधन का घेतलं नाही? याचा खुलासा अभिषेक बच्चनने केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

'राजा शिवाजी'साठी एकही रुपये मानधन का घेतलं नाही? अभिषेक बच्चनने सांगितलं खरं कारण, म्हणाला...
रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'राजा शिवाजी' सध्या चित्रपटगृहात गाजत आहे. या चित्रपटात रितेशने केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात सलमान खान, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेल्या नितांत आदरापोटी या कलाकारांनी या चित्रपटासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा निर्णय घेतला. चित्रपटासाठी मानधन का घेतलं नाही? याचा खुलासा अभिषेक बच्चनने केला आहे.
"हा व्यवहार नसून एक भावनिक गुंतवणूक"
News18 शी बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, जेव्हा एखाद्या कलाकाराला एखाद्या कथेवर किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनावर विश्वास असतो, तेव्हा मानधन ही गोष्ट दुय्यम ठरते. तो म्हणाला, "आजच्या काळात लोक सोशल मीडिया रिल्स आणि बातम्यांमधून कलाकार किती मानधन घेतात किंवा किती व्हॅनिटी व्हॅन मागतात यावर चर्चा करतात. पण शेवटी चित्रपट हा एक कलाप्रकार आहे.''
''जर आमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल, तर आम्हाला मानधन न घेण्यात कोणतीही अडचण नसते. हा केवळ पैशांचा व्यवहार नसून एक भावनिक गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीने खऱ्या अर्थाने प्रेरित होता, तेव्हाच खऱ्या कलेचा जन्म होतो."
अभिषेकने पुढे रितेश आणि जिनिलीया देशमुखचे कौतुक करताना सांगितले की, ज्या काळात चित्रपटांकडे केवळ आकड्यांचे गणित म्हणून पाहिले जाते, तिथे रितेश आणि जिनिलीयाने हे सिद्ध केले की प्रत्येक गोष्ट आकड्यांवर अवलंबून नसते. त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे केवळ एक 'प्रोजेक्ट' नसून एक पवित्र कार्य होते. अभिषेकने रितेश-जिनिलीया या दोघांनाही चित्रपटसृष्टीतील सर्वात नम्र आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून संबोधले.
चित्रपटातील तगडी स्टारकास्ट
जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. रितेशसोबतच या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विशेष म्हणजे, रितेश आणि जिनिलीयाची मुले, रियान आणि राहिल यांनी या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले असून त्यांनी शिवाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून या ऐतिहासिक चित्रपटाने तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे.