बिन पाण्याचे ‘टॉयलेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 20:54 IST
विनोद अँथनी थॉमस नावाच्या विद्यार्थ्यांनं पाण्याचा वापर करण्याची गरज नसलेल्या टॉयलेटची संकल्पना विकसित केली आहे.
बिन पाण्याचे ‘टॉयलेट’
कधी रेल्वेतून प्रवास केला आहे? हो? मग तुम्हाला चांगलेच माहित असले की, रेल्वेमधील टॉयलेट्सची अवस्था कशी असते. अस्वच्छ, दुर्गंधीपूर्ण अशी विशेषणेदेखीत तोडकी पडावी अशी परिस्थिती भारतीय रेल्वेतील ‘स्वच्छतागृहां’ची आहे. परंतु लवकरच हे चित्र बदलू शकते.कारण विनोद अँथनी थॉमस नावाच्या विद्यार्थ्यांनं ‘वॉटरलेस टॉयलेट’ म्हणजेचे पाण्याचा वापर करण्याची गरज नसलेल्या टॉयलेटची संकल्पना विकसित केली आहे. भारतीय रेल्वेसाठी अशा प्रकारची टॉयलेट्स डिझाईन करण्याच्या खुल्या स्पर्धेत त्याच्या आराखड्याला ७५ हजार रुपयांचा द्वितीत पुरस्कारदेखील मिळाला आहे.लखनऊमधील रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स आर्गनायझेशनतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत ‘पाण्याचा वापर न करता स्वच्छ आणि कसल्याही प्रकारची दुर्गंधी न येणारे टॉयलेट’ डिझाईन करायचे होते. त्यानुसार देशातील अनेक कुशल आणि इनोव्हेटिव्ह तरुणांनी आपापले डिझाईन्स सादर केले.मनिपाल युनिव्हर्सिटीच्या ‘फॅकल्टी आॅफ आर्किटेक्चर’मध्ये (एफओए) विनोद दहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. त्याने बनवलेल्या डिझाईनमध्ये हवाबंद पॉकेटमधून सर्व मल एका कन्वेयर बेल्टद्वारे मोठ्या स्टोरेजमध्ये जमा होण्याची सुविधा असणार आहे. मॅन्युयल क्रॅन्क व्हीलद्वारे ही सर्व प्रक्रीया केली जाणार असून स्टोरेजची निर्मिती अशा पद्धतीने केली आहे की, डिकंपोझिशन व बाष्पीभवनामुळे पाण्याचा अपव्यव कमी होईल. विनोद सांगतो, ‘आताच्या घडीला रेल्वे टॉयलेट्समध्ये मलाची विल्हेवाट थेट रेल्वेपटरीवर केली जाते. मलव्यवस्थापनाची ही पद्धत अतियश घाणेरडी, आरोग्याला हानिकारक, अनैतिक आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारी आहे. तसेच सध्या वापरात असलेल्या टॉयलेट्समध्ये फ्लशची उत्तम सुविधा नसल्यामुळे मल साचून दुर्गंध पसरतो. माझ्या डिझाईनमुळे पाणी व मनुष्यबळ दोहोंची बचत शक्य आहे.पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ने प्रेरित होऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सादर झालेल्या डिझाईन्समधून रेल्वे, उद्योग, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील तज्ञांनी विजेत्यांची निवड केली. विनोदसह राहूल गर्ग व सौरभ हंस यांच्या टीमलादेखील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.‘वॉटरलेस टॉयलेट्स’मुळे रेल्वेप्रवास अधिक सुखाचा, स्वच्छ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गंधीरहित होणार याचा आनंद सर्वाधिक आहे. ‘यंग इंडिया’चा चेहरामोहरा बदलण्यासाठी तरुणांनाचा झटावे, झुरावे, झिजावे लागणार. विनोद तर त्याची कल्पकता वापरून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. आपल्यालाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. बरोबर ना?