सुटी म्हणजे आराम, मौजमजा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ मिळालेला विसावा. थकल्या-भागल्या जिवाला सुटी मिळायलाच हवी. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ! आपल्या देशात सार्वजनिक सुट्यांच्या नावाने हाच अतिरेक बोकाळत चालला आहे. भारतात जेवढ्या सार्वजनिक सुट्या असतील तेवढ्या जगात इतरत्र कुठेही आढळणार नाहीत. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या या देशाने सुट्यांबाबत असा काही समभाव जोपासला आहे की, ‘काम कमी आणि सुट्या जास्त’ असेच काहीसे प्रगतीला खीळ घालणारे चित्र पाहायला मिळत आहे. काम न करताही त्या दिवसाचा मोबदला मिळणाऱ्या या सुट्यांमुळे सरकारी तिजोरी मात्र रिती होत चालली आहे. नेमका हाच धागा पकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या नावे असलेल्या सुट्या यापुढे बंद करण्याची घोषणा केली आहे. महापुरुषांबाबत देशवासीयांना अभिमान असायलाच हवा, कृतज्ञता व्यक्त केली गेलीच पाहिजे; पण ती सुटी दिली तरच व्यक्त होईल, असे कुणी सांगितले? उलट या दिवशी महापुरुषांचे स्मरण करून नेहमीपेक्षा थोडे अधिक काम केले तरच तो दिवस खऱ्या अर्थी सार्थकी लागेल. त्यामुळे एकाअर्थी त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. जपानमधील हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्यानंतर ही शहरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. मात्र, ध्येय, चिकाटी, जबरदस्त इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीमुळेच राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जपानने अल्पावधीतच सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रगतीची उत्तुंग झेप घेत सर्व जगासमोर आदर्श ठेवला. मात्र, त्यासाठी जपानचे कौतुक करणारे आपण कौतुकापेक्षा अनुकरण करणे गरजेचे आहे, हे सोयीस्करपणे विसरतो. असे म्हणतात की, जपानमध्ये सुट्या फक्त दहा दिवस असतात आणि तरीसुद्धा लोक वर्षातून फक्त पाच दिवसच सुटी घेतात आणि हेच जपानच्या प्रगतीमागचे खरे रहस्य आहे. महापुरुषांच्या नावे सुटी देण्यापेक्षा त्या दिवशी कार्यालयांमधून, शाळा-शाळांमधून सर्वच थोर महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला तर ते जास्त समर्पक ठरेल. यामुळे आपल्या भावी पिढीपुढे चांगला आदर्श ठेवता येईल. स्वहितापेक्षा देशहित, श्रमदान किती महत्त्वाचे असते, याचा धडा त्यांना चांगल्या प्रकारे गिरवता येईल. शिवाय सार्वजनिक सुट्या काही सर्वांनाच मिळत नाहीत. त्या सरकारी कार्यालयांपुरत्याच मर्यादित असतात. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यानेही जर सर्व सणावाराला सुटी घ्यायची ठरवले तर शेतीप्रधान असलेल्या या देशाच्या शेतीचे काय..? म्हणूनच सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या देशात सर्वच देशवासीयांना समान नियम लावणेही तितकेच गरजेचे आहे. भरपगारी सुटी मिळत असल्याने सुटीच्या नावे मौजमजा करण्याची, आळसात दिवस घालवण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची चुकीची सवय मोडून काम करण्याची सवय त्यांना लावणे ही काळाची गरज आहे. असे झाले तरच नाहक सुटी न घेता सर्वांनी मिळून केलेल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करणे आपल्याला सहज शक्य होईल. म्हणूनच आपल्या देशातील भरमसाठ सरकारी सुट्या रद्द करण्याबाबत केंद्र सरकारनेही गांभीर्याने विचार करायलाच हवा.
कशाला हव्यात सुट्या?
By admin | Updated: April 28, 2017 23:32 IST