‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ या हिंदीतील वाक्प्रचाराच्या अर्थाशी नाते सांगणारी माणसे प्रत्येकालाच कधी ना कधी भेटतात. राजकारणात तर अशी माणसे हमखास भेटतात. काल-परवा राज्याचे महसूलमंत्री राजमान्य राजश्री एकनाथराव खडसे उपाख्य नाथाभाऊ यांनी आपल्या दालनाबाहेर ‘बदल्यांसाठी कोणी भेटू नये’ असा फलक लावून तर कहरच केला. बदल्या आणि नाथाभाऊ यांच्यात असे कोणते हाडवैर आहे की त्यांना त्यासाठी चक्क फलक लावायची गरज भासावी? असा प्रश्न तो फलक पाहणाऱ्यांच्या मनात उपस्थित झाला नसेल तरच नवल! हे हाडवैर तसे जुनाट, असह्य रोगासारखे आहे. त्याच्या वेदना सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. खडसे भाजपातील हेवीवेट नेते मानले जातात. (निदान ते तरी तसे मानतात.) भाजपा सत्तेच्या जवळ पोहचल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या प्रभावळीतील हे एक अग्रगण्य नाव. खडसेंची ज्येष्ठता डावलून भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसविले तेव्हापासूनच खडसे अस्वस्थ आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असले तरी सत्ताकेंद्र खडसे यांच्याकडेच आहे, असेच सुरुवातीला वाटत होते. पण त्यांनाही शांत करण्याचे पाऊल फडणवीसांनी उचलल्यानंतर खडसे-फडणवीस वादाला तोंड फुटले. तरीदेखील अधूनमधून ‘मी काही मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नाही’ असे विधान करून खडसे स्वत:ची समजूत घालीत राहिले. परंतु समजूत आणि वास्तव यात मोठे अंतर असते. त्याच अंतराचे प्रत्यंतर देणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. त्यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्या! मुळात त्या बदल्या केल्या मुख्यमंत्र्यांनी; पण दुखावले गेले खडसे. वास्तविक, अशा बदल्यांमध्ये मला स्वारस्य नाही, अशी भूमिका घेऊन वावरणाऱ्या खडसेंनी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात बदल्या करताच आगपाखड करण्याचे कारण काय? खायचे आणि दाखवायचे दात वेगळे जाणवले की संबंधित माणसाच्या भंपकपणाबद्दल जशी शंका येऊ लागते, तसाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, तो म्हणजे खडसेंची भूमिका खरी की त्यांचा संताप खरा? यातील दोन्ही गोष्टींशी खडसे नाते सांगत असतील तर ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ असेच म्हणावे लागेल. राहिली गोष्ट फलकाची, तर असा फलक लावून लोकांना रोखणे म्हणजे लोकप्रतिनिधींच्या चौकटीत न बसणारी गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हटला की लोक येणारच. भले तर त्यांची कामे करू नका, किमान त्यांच्याशी संवाद साधणे, समस्या ऐकून घेणे इतके तरी अपेक्षित असते. पण तितकेही त्यांना जमले नाही. बहुधा खडसेंना प्रमिला टोपले यांच्या फलकाच्या किश्शाचा विसर पडलेला असावा असे दिसते. १९७८ च्या पुलोद सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या टोपलेंनी खडसेंच्या फलकासारखाच फलक लावून टीकेचे मोहोळ आपल्या अंगावर ओढवून घेतले होते. त्याचीच पुनरावृत्ती खडसे यांनी करून आम्ही कसे इतरांपेक्षा वेगळे आहोत, असा जणू आभासच निर्माण केला आहे.
--------
अध:पतनाचे लक्षण‘नावात काय आहे?’ असा प्रश्न बऱ्याचदा उपस्थित होतो. ‘मानो तो गंगा मॉँ, ना मानो तो बहता पानी’ अशीच काहीशी गत या सवालाची आहे. वास्तविक, कार्य आणि कर्तृत्वामुळे तसेच एखाद्या वैैशिष्ट्यामुळेच खरे तर एखाद्या नावाला वलय वा प्रतिष्ठा प्राप्त होत असते. नावे तशी अगणित असतात पण प्रत्येक नावाच्या वाट्याला तो भाग्याचा क्षण येत नसतो. नुसता गाडगेबाबा हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर हातात झाडू घेऊन दिवसा गावागावातील घाण दूर करणारे आणि सायंकाळी कीर्तनातून मनामनातली घाण दूर करण्यासाठी आयुष्य वेचणारे संत गाडगेबाबा उभे ठाकतात. स्वच्छता आणि गाडगेबाबा हे एक गृहीतकच बनले होते. त्यांचे नाम आणि कर्ममाहात्म्य ओळखून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ राबविले. त्यास राज्यभरातून प्रतिसादही मिळाला. मात्र त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या आताच्या युती सरकारने या अभियानाचे नामकरण ‘महाराष्ट्र ग्रामस्वच्छता अभियान’ असे करण्याचा घाट घातला आहे. आजपर्यंत विद्यापीठ, महामार्ग, नाट्यगृह, चौपाटी, सागरी सेतूच्या नामकरणावरून अनेक वाद झाल्याचे ऐकीवात होते; परंतु एखाद्या राजवटीत नावारूपास आलेल्या व समाजघटकाचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या योजनेचे नामकरण करण्याचा वेडेपणा आजवर कोणत्याही सरकारने केला नव्हता. ज्यांंनी स्वच्छतेचे महत्त्व मनामनात रुजविले व कीर्तनातून समाज प्रगतिशील केला त्या महामानवाच्या नावाला विरोध करणे म्हणजे शासनाच्या वैचारिक अध:पतनाचेच लक्षण मानायला हवे. दुर्दैवाने असे झालेच तर स्वच्छता होण्याऐवजी महाराष्ट्रवासीयांच्या मनात सरकारविषयी अस्वच्छताच अधिक वाढण्याची शक्यता आहे.