शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

हे कसले लोकप्रतिनिधी ?

By admin | Updated: March 28, 2017 00:45 IST

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एका विमान कर्मचाऱ्याला स्लीपरने मारहाण करून स्वत:च्या पातळीचे व मानसिकतेचे

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एका विमान कर्मचाऱ्याला स्लीपरने मारहाण करून स्वत:च्या पातळीचे व मानसिकतेचे जे प्रदर्शन केले त्याने शिवसेनेएवढीच महाराष्ट्राचीही मान शरमेने खाली गेली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांना, स्वत:ला राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष तिकिटे कशी देतात आणि लोक त्यांना मते तरी का देतात असाच प्रश्न या घटनेमुळे साऱ्यांना पडला आहे. विमानातले कर्मचारी तसेही साध्या प्रवाशांशी सौजन्याने वागतात. खासदार-आमदारसारख्यांशी त्यांची वागणूक जास्तीच्या विनम्रतेची असते. जागांची अदलाबदल व त्याविषयी निर्माण होणारी अडचण यात त्यांचा कुठलाही दोष नसतो. अशावेळी आपल्या संतापाला आवर घालण्याचे व साध्या माणुसकीने वागण्याचे ज्याला ठरविता येत नाही तो माणूस लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या सोडा, माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचाही नसतो. विमान कंपन्यांचे कर्मचारी त्यांना नेमून दिलेली कामे काळजीपूर्वक व तीही हसत करीत असतात. ते कर्मचारी आहेत आणि त्यांनाही अन्य नागरिकांप्रमाणे सन्मानपूर्वक वागविले पाहिजे असे वाटणे हा साधा शहाणपणा आहे. हे जे कोण रवींद्र गायकवाड आहेत त्यांना हे शहाणपण नाही, सौजन्य नाही आणि माणूसपणही नाही. आधीच अहंभाव असणारी माणसे जेव्हा संसदेच्या उंचीपर्यंत पोहचतात तेव्हा त्यांना जास्तीची शिंगे फुटतात. मग त्यांचे चालणे-बोलणे आणि वागणेही बदलते. त्यांच्यावर हिंदुत्वाचेच नव्हे तर राष्ट्रीयत्वाचेही संस्कार मग उरत नाहीत. अशी माणसे जनतेचे प्रतिनिधी म्हणून संसदेत जावी ही आपलेच कमीपण उघड करणारी बाब ठरते. लोकांना त्यांच्या लायकीचेच प्रतिनिधी मिळतात असे जे म्हणतात ते अशावेळी फार अंतर्मुख करणारे ठरते. आपली संसद तशीही किमान शंभरावर अपराध्यांनी आणि गुन्हेगारांनी भरली आहे. त्यात खुनी आहेत, बलात्कारी आहेत, हिंसाचाराला चिथावणी देणारे आणि हत्याकांडे घडवून आणणारे आहेत. खंडणीखोर आहेत आणि भारतीय दंड संहितेला ठाऊक नसणारे अपराध करणारेही आहेत. रवींद्र गायकवाड हे अशा प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्याला संसद आवर घालत नाही, सभापती बोल लावीत नाही, त्याचा पक्ष त्याला जाब विचारत नाही आणि मतदार ? ते तर त्याला निवडून देणारे म्हणून त्याच्या कृत्याला जबाबदारच असतात. गायकवाडांना कोणी शिक्षा करत नाहीत हे पाहून देशातील सगळ्या हवाई कंपन्यांनी त्याच्यावर प्रवासबंदी लादली आहे. जेव्हा कायद्याच्या यंत्रणा कुचकामी ठरतात वा गप्प राहतात तेव्हा समाजाने व सामाजिक संघटनांनीच पुढे यायचे असते. असा पुढाकार घेतल्याबद्दल सगळ्या हवाई कंपन्या आणि त्यांचे संचालक व कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन करणेच गरजेचे आहे. त्यांनी या गायकवाडलाच नव्हे तर संसद आणि शिवसेना हा त्याचा पक्ष यांनाही धडा शिकविला आहे. किमान त्यामुळे तरी आपण विमानातच नव्हे तर सर्वत्र सभ्यपणे व सौजन्याने वागावे असा धडा सगळ्या पुढारी म्हणविणाऱ्यांना मिळाला. राजकारण हे सेवेचे क्षेत्र आहे, संसद ही संवादाची जागा आहे आणि लोकशाही ही सगळ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची शिकवण देणारी संस्कारशाळा आहे हे ज्यांना कळत नाही त्यांना संसदेबाहेर घालविणेच योग्य ठरते. खासदार वरुण गांधी यांनी अकार्यक्षम व अपात्र लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार लोकांना असावा अशी मागणी करणारे एक खासगी विधेयक लोकसभेत आणले आहे. स्वित्झर्लंडच्या लोकशाहीत असा अधिकार तेथील जनतेला घटनेनेच दिला आहे. एका विशिष्ट संख्येएवढ्या मतदारांनी सह्या करून ‘हा प्रतिनिधी परत पाठवा’ असे सरकारला त्यात कळवायचेच तेवढे आहे. त्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींना निवडणुकीपुरताच लोकांचा धाक न बाळगता तो त्यांच्या सबंध कार्यकाळात बाळगावा लागतो. मग ते लोकांत वावरतात आणि त्यांचे वागणे सौजन्याचे असते. आमच्याकडे लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रवक्ता वा सेवक नसतो. तो त्यांचा मालक असतो. (एका मंत्र्याबाबत ‘तो आमचा देव आहे’ असे सांगणारी जाहिरातच त्याच्या भगतांनी विदर्भात लावलेली दिसली.) हे भगतही नुसते वेडे नसतात. ते लुच्चे आणि लबाड असतात. त्या पुढाऱ्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी ते त्याला देवत्वाचा अंगरखा चढवीत असतात. त्यातून आपल्या राजकारणात सध्या योग्यांची, साधूंची, साध्व्यांची, महाराजांची आणि स्वत:ला धर्माचार्य म्हणवून घेणाऱ्यांची चलती मोठी आहे. मात्र धर्माचे म्हणवून घेणारे हे लोकही काही कमी अहंकारी नसतात. त्यांच्या अहंतेला धर्माचे त्रिशूळ वा एखादे जालिम शस्त्र जडलेले असते. ही माणसेही हिंसेवर उतरतात. हिंसाचार घडविल्याने आपली लोकप्रियता वाढते असा त्यांचा समजही असतो. दिल्ली, गुजरात आणि बाबरीसारख्या घटनांनी तो खराही ठरवला असतो. हिंसेच्या बळावर जेथे सरकारे बनतात तेथे रवींद्र गायकवाडांसारखी माणसे फार लहान व क्षुल्लकही दिसू लागतात. असो, हा आपल्या लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार आहे. त्याचे विकृत स्वरूप जगभरच्या माध्यमांना लोकांसमोर आणावेसे वाटले ही आपल्या राजकारणाची पातळी लक्षात आणून देणारीही बाब आहे. असे प्रकार पुन्हा करू नका, असेच या निमित्ताने आपल्या पुढारी वर्गाला सांगायचे आहे.