तुरीच्या डाळीचे भाव कमी होऊन ते किलोला १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत, असे मुख्यमंत्र्यांसह सगळे सरकारी प्रवक्ते सांगत असताना त्या भावात ती विकणारी दुकाने ग्राहकांना मात्र सापडत नाहीत. त्यांना अजूनही १८० ते २०० रुपये किलो दराने ती विकत घ्यावी लागते. डाळीचे भाव असे असताना आता तांदळाच्या भावानेही भरारी घेतली असून तो १०० रुपये किलो दराने विकला जाऊ लागला आहे. तो तीन रुपये किलो दराने देण्याचे सरकारी आश्वासन रेशन दुकानांपुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यातल्या अनेक दुकानातून तांदूळ दिसेनासाही झाला आहे. भाज्यांचे भाव कमी होत नाहीत आणि तांदूळ व डाळीसारखी जीवनावश्यक धान्ये हाताला न लागणारी झाली आहेत ही बाजाराची स्थिती आणि सामान्य ग्राहकाची रडकथा आहे. हिवाळ््यात भाज्यांची आवक वाढते आणि त्या सामान्यांना परवडणाऱ्या भावात मिळू लागतात असा आजवरचा अनुभव आहे. यावेळचा अनुभव मात्र ग्राहकांचा जीव कासावीस करणारा आहे. राज्यात पाऊस कमी झाला म्हणून तांदळाचे पीक घटले असे राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी नुसते बोलून टाकताच त्याचे साठे दडवणाऱ्यांना एक मोठी संधी आपोआपच मिळून गेली आहे. मध्यंतरी कांद्याचे भाव अस्मानाला टेकले तेव्हा केंद्र सरकारने साठेबाजांविरुद्ध कारवाई करून ते काहीसे खाली आणण्यात यश मिळविले होते. तुरीच्या डाळीचे साठे दडविणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारसह साऱ्या देशातील सरकारांनी तसेच छापे घातले व हजारो टन डाळ जप्तही केली. ती बाजारात आल्याचे सांगितले गेले पण त्या तशा आलेल्या डाळीनेही आपले भाव पूर्वीचेच असल्याचे ग्राहकांना दाखवून दिले. कमी उत्पन्न असणाऱ्या व कनिष्ठ मध्यमवर्गात जमा होणाऱ्या अनेक घरांनी डाळीची खरेदी करणे वा वरण खाणे थांबविले असल्याची चर्चा आता घरोघरी होऊ लागली आहे. जो वर्ग याहूनही खालच्या उत्पन्न गटात येतो त्याचे खाणे कसे होत असेल हा सरकारएवढाच समाजातील आपल्या साऱ्यांच्या चिंतेचा विषय आहे. डाळीच्या पोषण आहारावाचून अल्पवयीन मुलामुलींच्या प्रकृतीत कायमचे अपुरेपण येते. जे रानमुलखात आजवर घडत आले तेच आता ग्रामीण व शहरी भागातही घडणार असल्याची ही चिन्हे आहेत. भाववाढीचे एक तंत्र हे की ती सामायिकपणे वाढते. एका वस्तुचे भाव वाढले की तिच्या पाठोपाठ इतरही वस्तू महाग होऊ लागतात. एकेकाळी औषधे महागल्याची ओरड व्हायची. त्या मागोमाग भाज्यांच्या किंमती वाढल्याची चर्चा व्हायची. मात्र रोजच्या जेवणातले भात आणि वरण महागल्याची वा ते दिसेनासे होऊ लागल्याची चर्चा फक्त आताच म्हणजे ‘अच्छे दिन’ आल्यानंतरच होताना दिसत आहे. सामान्य माणूस आणि त्याची गरज हा माध्यमांच्या आवडीचा विषय पूर्वी नव्हता आणि आताही तो नाही. त्यामुळे त्यात येणारी चर्चा रामदेवबाबाच्या नूडल्सची असते, महागड्या हॉटेलातल्या पदार्थांविषयीची असते आणि वाहिन्यांवरही सामान्य माणसांना कधी पाहता न आलेल्या पदार्थांची पाककृती लोकाना दाखविली जाते. परिणामी त्यांचा खर्च परवडू शकणाऱ्यांनाच ते पाहाणे आवडते. साध्या माणसांच्या मनात मात्र तीच दृष्ये त्या पदार्थांविषयी आणि एकूण जीवनाविषयीही निराशा उत्पन्न करणारी होतात. शेतकऱ्यांच्या व भाजी उत्पादकांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. मात्र तो भाव त्यांना मिळवून दिला तरी बाजारातले भाव आजच्या एवढे चढत नाहीत. शेतकऱ्यांकडून वा भाज्यांच्या उत्पादकांकडून अतिशय अल्पदरात त्यांचा माल विकत घेऊन तो अनेकपटींनी वाढविलेल्या किंमतीत बाजारात आणणाऱ्या दलालांचा वर्ग हा त्यातला खरा अडसर आहे. एकीकडे शेतकऱ्यांना लुबाडताना दुसरीकडे तो ग्राहकांचेही खिसे कापत असतो. चार ते सहा रुपये किलो दराने संत्री खरेदी करणारा दलाल बाजारात तीच ६० ते ६५ रुपये किलो दराने विकायला आणतो. या वर्गाच्या मनमानीला आणि नफेखोरीला आळा घालण्यासाठी कायदे होताना दिसत नाहीत आणि ते झाले तरी अमलात येत नाहीत. सरकार शेतमालाच्या किंमती ठरवून देते, पण शेतमाल घरात येईपर्यंत थांबण्याएवढी ऐपतच लहान व मध्यम शेतकऱ्यांत नसते. परिणामी तो उभी पिकेच दलालांना विकत असतो. वास्तवातल्या अशा अडचणींना आळा घालायला ना शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणविणारे नेते पुढे येत ना सरकार. त्यातून सरकार व प्रशासन यावर शेतकऱ्यांचा प्रभाव कितीसा असतो? त्याहून दलालांचे वजन मोठे असते. भाववाढीचे हे दुष्टचक्र चालू रहायला समाजाच्या एका वर्गाजवळ जमा होऊ लागलेली मोठी मिळकतही कारणीभूत होते. आता सातव्या वेतन आयोगाचा अहवाल सरकारसमोर येणार आहे. त्यामुळे वेतनधारक सुखावले आहेत. या वर्गाला धान्य वा भाज्या घेणे सुसह्यही आहे. धनवंतांना भाववाढीची चिंता नसते. मात्र ज्यांच्या वाट्याला कोणताही आयोग येणार नसतो त्याचा विचार कोणी करायचा? ही जीवघेणी महागाई व तीत दुरावत जाणारे नित्याचे खाद्यपदार्थ हा प्रकार एका मोठ्या वर्गाचे प्राण कंठाशी आणणारा आहे. देशातले अर्थतज्ज्ञ आणि त्यांचा सल्ला घेणारे सरकार या प्रकाराने कधी गांजल्याचे दिसत नाही आणि तेच आपल्या साऱ्यांचे खरे दुर्दैव आहे.
साध्या डाळ-भातालाही महागलो काय ?
By admin | Updated: November 20, 2015 03:19 IST