शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल!

By admin | Updated: January 18, 2016 00:10 IST

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे जणू एक साहित्यिक होल्डॉलच आहे! शब्दबंबाळ साहित्यिक होल्डॉल ! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या सारस्वताने मराठी साहित्य विश्वाच्या आणि ते साहित्य विश्व ज्याच्या मुशीतून साकारते त्या मराठी जीवनव्यवहाराच्या विविध अंगांना स्पर्श करावा, अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. माननीय सबनीस यांनी ही अपेक्षा प्रचंड गांभीर्याने शब्दश: मनावर घेतलेली दिसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शेतमालाचे हमीभाव, बहुसांस्कृतिकता, ‘सेक्युलॅरिझम’, राष्ट्रवाद, असहिष्णुता इथपासून ते गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ भिजत पडलेल्या सीमा प्रश्नापर्यंत सबनीस महाशयांनी सगळ्यांनाच वेठीला धरलेले आहे. साहित्याच्या प्रांतातही ‘सेक्युलर’ वाङ्मयीन प्रवाहापासून ते विद्रोही, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, ग्रामीण, गांधीवादी, मार्क्सवादी, विनोदी, भटक्या-विमुक्तांचे साहित्य, स्त्रीसाहित्य, बालसाहित्य, पर्यावरणवादी, कोशवाङ्मय ते ‘चारोळ्यां’पर्यंतच्या यच्चयावत साहित्य प्रवाहांना अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात हजेरी लावणे भाग पाडले आहे. या औरसचौरस पसाऱ्यापायी सबनीस यांच्या विवेचनास कोठेही कोणत्याही एकात्म सूत्राचा मागमूस लागत नाही. त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांवर जाता जाता केलेली शेरेबाजीवजा टिप्पण्णी, असेच सबनीस यांच्या मनोगताचे स्वरूप आहे. परिणामी, पसारा भरपूर दिसला तरी खोलीचा ठणठणाटच प्रकर्षाने जाणवतो. मराठी साहित्यातील विविध दालनांबद्दल अध्यक्ष महोदयांना काही ना काही म्हणायचे आहे, एवढाच बोध हे बाड नजरेखालून घातल्यानंतर होतो. मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक अशी प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांची ओळख असली तरी त्यांच्यातला समीक्षक त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रगटलेला जाणवत नाही. त्या त्या साहित्य प्रकारातील प्रचलित ढोबळ प्रवाह आणि साहित्याच्या त्या प्रांतात गाजणाऱ्या साहित्यकारांचे मोजके व निवडक नामनिर्देश यांचाच काय तो निर्देश सबनीस यांच्या टिप्पण्णीत असल्याने वाङ्मयेतिहासाच्या खंडांतील काही पाने आपण वाचतो आहोत की काय, असा भास वारंवार होत राहतो. चमकदार परंतु प्रत्यक्षात ठोस अर्थनिष्पत्ती न होणाऱ्या वाक्यांची ठायी ठायी पखरण हे सबनीस यांच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यातही शब्दांच्या अनावर हव्यासापायी अध्यक्षांची गाडी काही ठिकाणी औचित्याच्या आणि अभिरुचीच्या जोडरुळांवरून घसरताना दिसते. ‘शोषणमुक्त पत्रकारिता आणि लोकशाहीचे भवितव्य’ या मथळ्याखाली अध्यक्ष महाशयांनी वृत्तपत्र व्यवसायातील पत्रकर्मींच्या साहित्यनिर्मितीतील योगदानाचा ऊहापोह केलेला आहे. प्रादेशिक पत्रकारांच्या प्रातिभ शब्दाविष्काराने मराठी भाषा व वाङ्मयीन व्यवहाराला केलेल्या मूल्यात्मक योगदानाचा यथोचित निर्देश केल्यानंतर पुढे सबनीस यांनी जे एक वाक्य घातलेले आहे, ते आधीच्या विवेचनाची चव पूर्णपणे घालवणारे असेच आहे. ‘‘परंतु काही संपादक सुपारी घेऊन अजिंडा ठरवितात. ही पत्रकारिता चौथ्या स्तंभाला शोभणारी की लोकशाहीच्या तिरडीच्या दांडीला शोभणारी? याचा विचार करणे आवश्यक’’, या वाक्यातील सबनीस यांची उद्विग्नता समजण्याजोगी असली तरी तिचा भडक आविष्कार मात्र समर्थनीय अजिबातच नाही. वृत्तपत्रांचे मालक आणि वृत्तपत्रात काम करणारे संपादकासह यच्चयावत पत्रकर्मी यांच्या संबंधांमध्ये अलीकडील काळात घडून आलेल्या गुणात्मक बदलांबाबत मतप्रदर्शन करणारे सबनीस यांचे विधान तर कमालीचे भोंगळ आहे. ‘‘भारतातील मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याच्या साक्षी आहेत. निदान त्या संतत्वाला तरी काळजात व व्यवहारात स्थान मिळावे. म्हणजे पत्रकारांपासून कामगार-मजुरांपर्यंतचे सर्व शोषित सर्वार्थाच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतील’’, या सबनीस यांच्या शब्दबंबाळ मल्लीनाथीची अर्थनिष्पत्ती काय? भारतातल्या कोणत्या भागातील कोणती मालकशाही संतांच्या संस्कारात रमल्याचे साक्षीदार बनण्याचे अहोभाग्य सबनीस यांना लाभले हे त्यांचे तेच जाणोत ! मराठी शाळांच्या आजच्या दुरवस्थेचे उत्तरदायित्व सरकारच्या गळ्यात बांधताना, ‘‘मराठी शाळांची गळती व अवहेलना शासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा मराठी माणसाच्या नव्या पिढ्यांचे सांस्कृतिक पाप महाराष्ट्र शासनाच्या कपाळावर कोरले जाईल’’, अशी सबनीस यांनी उच्चारलेली भविष्यवाणी सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडणारी आहे. आजच्या मराठी पिढ्या आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणारच नसतील, तर साहित्य संमेलनांसारख्या उत्सवांचे प्रयोजनच मुदलात काय, असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. या प्रश्नांचे उत्तर सबनीस यांनी द्यावे अशी अपेक्षा नाही कारण ते माहीत असते तर या उत्सवाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी आजवर इतका आटापिटा केलाच नसता !