शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निर्बुद्ध ट्विटरपणा

By admin | Updated: June 24, 2016 01:05 IST

तंत्रज्ञान हे साधन असल्याने ते ज्याच्या हाती पडते, त्याच्या कुवतीवर ते कसे व कशासाठी वापरले जाईल, हे ठरत असते. पण ते वापरताना त्याला ज्ञानाचाही काही आधार असावा लागतो

तंत्रज्ञान हे साधन असल्याने ते ज्याच्या हाती पडते, त्याच्या कुवतीवर ते कसे व कशासाठी वापरले जाईल, हे ठरत असते. पण ते वापरताना त्याला ज्ञानाचाही काही आधार असावा लागतो, हे राजकीय पक्ष क्वचितच लक्षात घेतात. काँगे्रस पक्ष, सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची जी वेळ आली आहे, ती त्यामुळेच. शहीद भगतसिंह यांच्या हौतात्म्य दिनाच्या दिवशी २३ मार्चला जी भित्तीचित्रे लावण्यात आली होती, त्याचा आधार घेऊन काँगे्रसच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यातून मतप्रदर्शन करताना, भगतसिंह फासावर गेले, तर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफीची याचना केली, असे म्हणून, ते ‘देशद्रोही’ असल्याचे सूचित केले होते. आता तीन महिन्यांनी स्वातंत्र्यवीरांचे नात पुतणे रणजित सावरकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवून काँगे्रस पक्ष, सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ही नोटीस १६ जूनला पाठविण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या या नातेवाईकांस तीन महिन्यांनंतर सावरकरांच्या बदनामीची जाणीव होऊन अचानक कशी काय जाग आली, हा प्रश्न विचारला जाणे अगदी साहजिक आहे. उघडच आहे की, त्यामागे राजकीय हेतू आहे. पण मुद्दा तो नाही. काँगे्रस पक्षाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यातून असा संदेश पाठवला कसा गेला, हाच खरा प्रश्न आहे. ज्याला कोणाला हे काम करण्याची जबाबदारी काँगे्रस पक्षाने सोपवली, त्याचे ज्ञान सोडाच, माहितीही किती तोकडी आहे, ते या संदेशावरून दिसते. किंबहुना ही व्यक्ती पूर्णपणे निर्बुद्धच आहे, असे म्हणणे भाग आहे. तसेच या व्यक्तीला अशा कामासाठी नेमणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ठरेल. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाच्या विचारांचा जो गजर करीत आहे, त्याचा पहिला उद्घोष केला, तो सावरकरांनीच. महात्मा गांधी यांचा खून करणारा नथुराम सावरकरांंनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेशी संबंधित होता, हेही खरे. गांधीजींच्या खुनात हात असल्याचा आरोप सावरकरांवर होता आणि पुरेशा पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली, हेही ऐतिहासिक सत्य आहे. मात्र त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी लावली जाते, ती अंदमानात त्यांना काळ्या पाण्याच्या ज्या दोन शिक्षा ठोठावल्या गेल्या, त्याआधीच्या क्रांतिकारकत्वाबद्दल. अंदमानच्या आधीचे व नंतरचे असे सावरकरांच्या कारकिर्दीचे दोन सरळ भाग पडतात. अंदमान आधीचे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ होते आणि काळ्या पाण्यावरून परत आलेले सावरकर हे ‘हिंदुत्ववादी’ होते. पण स्वातंत्र्याच्या दुर्दम्य आकांक्षेतूनच ‘स्वातंत्र्यवीर’ ते ‘हिंदुत्ववादी’ हे सावरकरांचे वैचारिक परिवर्तन झाले होते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अंदमानच्या काळकोठडीत अमानुष अत्याचार भोगावे लागलेल्या सावरकरांची वाटचाल या वैचारिक परिवर्तनाकडे होत गेली, ती ‘भारत सतत पारतंत्र्यात का जात राहिला’ या प्रश्नाची उकल करण्याच्या ओघात. युरोपीय येण्याआधी भारतात मुस्लीम व इतर आक्रमक आले आणि त्यांना आपला समाज विरोध का करू शकला नाही, हा प्रश्न त्यांना पडत गेला. युरोपीय समाजाचा सांस्कृतिक व धार्मिक एकजिनसीपणा हे त्यांचे बलस्थान आहे, असे सावरकर यांना वाटू लागले. त्यांना ज्या आयरिश क्रांतिकारकांचे आकर्षण होते, त्यांच्या देशातही असा एकजिनसीपणा होता. शिवाय विज्ञानाच्या आधारे होत गेलेली प्रगती हाही मुद्दा होताच. भारतात बहुसंख्य हिंदू असूनही असा एकजिनसीपणा का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधताना, एकीकडे समाजाला विभागणारी जातिव्यवस्था आणि हिंदू धर्माची सर्वसमावेशकता या दोन मुद्यांपाशी सावरकर आले. त्यातूनच पुढची ‘कडवा हिंदू’ ही संकल्पना ‘हिंदुत्ववादा’च्या रूपाने साकारली आणि एकजिनसीपणाच्या आड येणाऱ्या जातिव्यवस्थेला असलेला त्यांचा विरोध आकाराला आला. पण आंतरजातीय विवाहाचे समर्थक सावरकर आंतरधर्मीय विवाहाचे विरोधक होते. देशाला शस्त्रास्त्रांच्या अंगाने ‘बलिष्ट’ करणारी आधुनिकता हवी, हा सावरकर यांचा आग्रह होता. ‘गाय’ या विषयावरचे त्यांचे विचार या ‘बलिष्ट’ भारताच्या संकल्पनेशी निगडीत होते. महात्माजींच्या खुनात हात असल्याचा आरोप झाल्याने सावरकरांची ही दोन रूपे त्यांच्या वैचारिक विरोधकांनी फारशी कधी लक्षातही घेतली नाहीत. त्यातच गेल्या काही दशकांत संघाचा वावर वाढत गेला, तसे त्यांनी ‘सावरकर’ याची प्रतिमा प्रचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. सावरकर व संघ कधीच एकत्र येऊ शकले नाहीत, हेही ऐतिहासिक सत्य स्वातंत्र्यवीरांच्या विरोधकांनी लक्षात घेतले नाही. सावरकरांच्या भक्तांना तर स्वातंत्र्यवीरांची ही दोन रूपे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला पडलेल्या मर्यादा मान्य होणे शक्यच नाही. साहजिकच सावरकर विरोधकांचा निर्बुद्धपणा आणि झाडपबंदपणा या ‘ट्विटर वादा’मुळे उघड झाला, इतकाच या वादंगाला मर्यादित अर्थ आहे.