शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांना शहाणपण शिकवण्याची गरज

By admin | Updated: July 25, 2016 03:36 IST

उत्तर प्रदेशच्या कोणा दयाशंकरनामे भाजपाच्या पुढाऱ्याने, त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर चार वेळा निवडल्या गेलेल्या मायावतींची तुलना वारांगनेशी करावी आणि त्यांच्या एका सरकारात

उत्तर प्रदेशच्या कोणा दयाशंकरनामे भाजपाच्या पुढाऱ्याने, त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर चार वेळा निवडल्या गेलेल्या मायावतींची तुलना वारांगनेशी करावी आणि त्यांच्या एका सरकारात आपला पक्षही सहभागी होता याचे विस्मरण व्हावे याएवढी शरमेची आणि हीनत्वाची दुसरी सीमा नाही. दयाशंकर हे चांगले नाव धारण करणारे हे गृहस्थ कोणत्या पातळीवरचे असू शकतात आणि एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते कसे होऊ शकतात, या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्या राजकारणाच्या दर्जावरही बराच प्रकाश पडू शकणारा आहे. ज्या दिवशी दयाशंकर यांनी ती अभद्र वाणी उच्चारली त्याच दिवशी संसदेत एका दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण चर्चेला यावे हाही एक दुर्दैवी आणि साऱ्या देशालाच त्याची मान खाली घालायला लावणारा योगायोग ठरला. संसदेतील भाजपासह सर्व राजकीय पक्षांनी व नेत्यांनी मायावतींची बाजू घेत दयाशंकर यांचा निषेध करावा ही बाब अपेक्षित होती. शिवाय दलित व महिलांवरील अशा अत्याचारांविरुद्ध देशाचे राजकारण निदान जाहीर पातळीवर संघटित झाले असल्याची ती निदर्शक ठरली. दिल्लीत आणि गुजरातमधील उना या खेड्यात हे घडत असतानाच महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड व्हावे आणि त्याची चर्चा राज्याच्या विधिमंडळात होताना दिसावी ही बाब अशा अपराधांबाबत उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांत महिला व दलितांवर होत असलेल्या जुलूम जबरदस्तीच्या बंदोबस्ताबाबत अजूनही बरेच काही करण्याजोगे आहे हे सांगणारी आहे. मुंबई विधानसभेतील ही चर्चा संपत नाही तोच नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या शहरात एका बारा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला जावा ही बाब तर या दुर्दैवी समजाला बळकटी देणारी आणि आपले सामाजिक रानटीपण अजून संपायचे आहे हे दर्शविणारी आहे. तसेही दिल्लीत भाजपाचे मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून दलित आणि महिला यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. या अत्याचारांनी विद्यापीठात शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला आत्महत्त्या करायला, तर अनेक स्त्रियांना मरणयातना भोगायला भाग पाडले आहे. या अपराधातले आरोपी सापडले तरी त्यांच्या विरोधातले खटले मंद गतीने चालतात. त्यांचा निकाल लागेपर्यंत पोलीस व न्याय यंत्रणा यांचा लोकमानसावरील धाक संपलेला असतो. पुढे त्या खटल्यांचा निकाल काय लागला आणि त्यातील आरोपींचे पुढे काय झाले याविषयीची सगळ्या संबंधितांची उत्सुकताही संपलेली असते. शिवाय हे घडत असताना तसेच नवे अपराध आणखी अन्यत्रही घडत असतात. कायदे कडक करणे, जलदगती न्यायालये स्थापन करणे, अशा खटल्यांची मुदतबंद सुनावणी होणे हे व यासारखे उपाय यावर नेहमी सुचविले जातात. मात्र त्यांची परिणामकारकता फारशी मोठी नसते. अमेरिकेतही वर्णभेदविरोधी कायदे आहेत. पण त्या कायद्यांचा अंमल करणारे बहुसंख्य पोलीस व त्यांच्या यंत्रणा अजून वर्णविद्वेषी राहिल्या आहेत. नुकतीच एका कृष्णवर्णीय अमेरिकनाची हत्त्या तेथील पोलिसांनी त्याच्या डोक्यात गोळी घालून कशी केली याचे चित्रण जगाने दूरचित्रवाहिनीवर पाहिले आहे. त्यातून डोनाल्ड ट्रम्पसारखे वर्णद्वेषी पुढारी त्या प्रगत देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविताना आणि त्याही वेळी ते स्त्रिया, कृष्णवर्णीय अमेरिकन, मुसलमान, मेक्सिकन इत्यादिंसह साऱ्या आशियाई देशांविषयी केवढी विद्वेषाची भाषा बोलतात हेही जगाला दिसले आहे. या ट्रम्प यांचे अनेक नमुने भारतातही आहेत. शिवाय ते मोठ्या पदांवर विराजमानही आहेत. दयाशंकर हे त्यातलेच एक. पण माणसेच अशी असतात असे नाही. व्यवस्थेच्या खुर्च्यांवर बसलेले तथाकथित मान्यवरही त्यातलेच असतात. राजस्थानात भवरीदेवी या दलित महिलेवर बलात्कार करणाऱ्या सवर्णांच्या सबंध टोळीला दोषमुक्त करताना ‘सवर्ण पुरुष दलित स्त्रीवर बलात्कार करूच शकत नाहीत’ असे भयंकर विधान तेथील न्यायालयाने केले होते. सबब कायदे कडक करून व अशा अपराधांना जास्तीच्या मोठ्या शिक्षा सांगून ते कमी होण्याची शक्यताही फारशी नाही. तो राजकारणासह समाजाची मानसिकता (माइंड सेट) बदलण्याचा विषय आहे. त्यासाठी स्त्री-पुरुष समतेएवढाच व्यक्ती-व्यक्तीच्या समतेचा संस्कारही आवश्यक आहे. तो शाळकरी अवस्थेपासूनच मुलामुलींवर करण्याची गरज आहे. अशा संस्काराची व शिस्तबद्धतेची शिकवण सर्वच वयातील स्त्रीपुरुषांना आणि विशेषत: समाजात पुढारी व आदर्श म्हणून मिरविणाऱ्या माणसांनाही देण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपले राजकारण हीच अशा विद्वेषाची शाळा झाली आहे. माणसा-माणसांतील विद्वेषाची आणि स्त्रियांविषयीच्या विकृतीविषयीची भावना राजकारणात पसरली जाताना आपणही पाहिलेली असते. संसद व विधिमंडळातील भाषणेही जेव्हा व्यक्तिनिहाय न होता पक्षनिहाय होतात (आपले पक्षही धर्मनिहाय आणि जातीनिहायच अधिक आहेत) तेव्हाही आपण त्यांच्यातील याच विद्वेषाचा अनुभव घेत असतो.