शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

म्हणे, नमाज आणि सूर्यनमस्कार एकच

By admin | Updated: April 1, 2017 00:38 IST

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का

कोणत्याही धर्माची व त्याच्या उपासनेची थट्टा वा त्याविषयीचे ‘अजाण’ म्हणविणारे वा दिसणारे वक्तव्य त्या धर्माच्या श्रद्धांना धक्का देणारे व त्याच्या अनुयायांचा संताप ओढवून घेणारे असते. स्वधर्माविषयीचे प्रेम बाळगणाऱ्यांची तर परधर्माच्या अशा श्रद्धांविषयीची याबाबतची जबाबदारी मोठी व अधिक गंभीर असते. त्यातून अशी बालिश वक्तव्ये करणारी माणसे सत्तापदावर असतील तर त्यांचे तसे वागणे एखाद्या दंगलीला प्रोत्साहन देणारेही ठरत असते. त्याचमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सूर्यनमस्कार आणि नमाज या दोन्ही गोष्टी सारख्याच असून, त्यातून होणारी व्यायामाची कवायतही सारखीच असते’, असे जे अडाणी व पोरकट विधान केले ते त्यांच्या राज्यातील सगळ्या अल्पसंख्यकांना खोलवर दुखवून गेले आहे. सूर्यनमस्कार ही हिंदू धर्मातील उपासना आहे आणि ती सूर्यदेवाच्या नावाने केली जाते. त्या उपासनेत व्यायामासाठी लागणाऱ्या देहाच्या हालचाली आहेत. पण त्या शरीर कमावण्याएवढ्याच ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या आहेत. याउलट नमाज ही मुसलमान धर्माच्या ‘अल्लाह’ या एकमेव परमेश्वराची उपासना आहे. व्यायाम तीतही आहे. पण तिचे अंतिम पर्यवसान अल्लाहविषयीची आपली श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहचविण्यात होणारे आहे. सूर्य हा अल्ला नाही. किंबहुना हिंदूंच्या सर्व देवदेवतांहून अल्लाहचे स्वरूप वेगळे आहे. शिवाय इस्लामच्या भूमिकेनुसार तो जगाचा एकमेव परमेश्वर आहे. त्यांची उपासनापद्धतीही आपल्या उपासनेहून वेगळी आहे. एखादा गांधी जेव्हा ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असे म्हणतो तेव्हा तो या सगळ्या धर्म भावनांच्या पल्याड गेलेला असतो आणि त्याची जगभरच्या सर्व धर्मांच्या ईश्वरी रूपांबाबतची धारणा सारखी व श्रद्धेची असते. योगी आदित्यनाथ यासंदर्भात गांधीजींच्या आसपासही फिरकू शकणारे पुढारी नाहीत. त्यांनी नमाजाला सूर्यनमस्कारासोबत बसविणे याचा अर्थ उघड आहे. त्यांच्या मानसिकतेत सूर्यनमस्कार ही हिंदूंची धर्मोपासना मुसलमानांवर लादायची आहे. त्यासाठीच त्यांना अशा वक्तव्यांमधून एका संघर्ष स्पर्धेचा आरंभ करायचा आहे. खरे तर आपल्या धर्माविषयी एकारलेली श्रद्धा बाळगणाऱ्यांनी इतर धर्मांविषयी बोलणेच टाळायचे असते. कारण त्यातून द्वेष आणि तिरस्काराखेरीज काहीच प्रगट होत नाही. हिंदूंएवढीच ही बाब मुसलमान व अन्य धर्मांच्या प्रवचनकारांनीही नीट ध्यानात घेतली पाहिजे. सध्या आदित्यनाथांची व त्यांच्या पक्षाची देशात चलती असल्यामुळे त्यांचे म्हणणे खपून गेले. तरीही आझमखान या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व माजी मंत्र्याने त्यावर आपली प्रतिक्रिया देताना ‘हे आदित्यनाथांनी म्हटले म्हणूनच खपले, हेच मी म्हटले असते तर सरकारने मला बेड्या घातल्या असत्या’ असे उद््गार काढले आहेत. कोणताही मुसलमान नमाज व सूर्यनमस्कार एक आहेत असे म्हणणार नाही. त्यांच्या धर्मोपासनेतील प्रत्येकच बाब हिंदूंहून वेगळी आहे. या दोन धर्माच्या लोकांमध्ये विश्वास व एकात्मता निर्माण करायची तर त्यांच्या उपासनापद्धतीवर हल्ले चढवून वा सूर्यनमस्काराची तुलना नमाजाशी करून चालणार नाही. त्यासाठी त्यांची मने एकत्र आणावी लागतील आणि त्याला लागणारे सामर्थ्य, प्रगल्भपण, उंची, धाडस, सहनशक्ती आणि तयारी आदित्यनाथांपाशी नाही. जे मुसलमान वा ख्रिश्चन धर्माची उपासनास्थळे जमीनदोस्त करण्यात पुढाकार घेतात वा तशा कृत्यांचे समर्थन करतात त्यांना याविषयी बोलण्याचा अधिकारही नसतो. आदित्यनाथांनाही तो नाही. मुसलमान वा अन्य धर्मीयांना आपल्या बहुसंख्येच्या बळावर धाकात ठेवून त्यांच्यावर आपले मत त्यांना लादायचे आहे. त्यांच्या सरकारची एवढ्या दिवसातली वाटचाल आणि त्यांच्या पक्षाचे निवडणूक काळापासूनचे एकधर्मीय धोरण याची साक्ष देणारे आहे. राष्ट्रीय एकात्मता वा हिंदू मुस्लीम ऐक्य आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या संकल्पनांपासून अशा माणसांनी व त्यांच्या संघटनांनी आपले दूरवरचे अंतर आजवर राखले आहे. ते त्यांचे काम नाही आणि तशी जबाबदारी त्यांना पेलणारीही नाही. आदित्यनाथांचे हे वक्तव्य त्याचमुळे अल्पसंख्यकांनी एखाद्या अपमानकारक टवाळीसारखे घेतले आहे व तसे ते त्यांनी घेणे रास्तही आहे. आपली विश्वसनीयता खरी केल्याखेरीज व ती इतरांच्या मनावर ठसविल्याखेरीज अशा महत्त्वाच्या विषयावर पुढाऱ्यांनी बोलायचे नसते. परंतु आदित्यनाथांसमोर मोदींचा आदर्श आहे. मुसलमानांवर बहिष्कार, त्यांच्याविषयीचा दुरावा, त्यांना दिलेला त्रास व प्रसंगी त्यांची केलेली कत्तल हा बहुसंख्यकतावादाला सत्तेपर्यंत पोहचविणारा प्रकार आहे हे त्यांना कळून चुकले आहे. आपली बहुसंख्य जनताही विचार वा कार्यक्रम याहून धर्मश्रद्धा व जातीय संघटन यांच्यासोबत जास्तीची जुळली असल्याने स्वधर्माविषयीचे प्रेम सांगण्याहून परधर्मीयांची अशी टवाळी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांच्या लाभाचाही होतो. आदित्यनाथांच्या आताच्या नमाजाविषयीच्या भाष्याचे खरे कारण त्यांच्या या लाभकारी राजकारणात दडले आहे हे उघड आहे आणि ते अल्पसंख्यकांएवढेच बहुसंख्येतील जाणकारांनीही गंभीर होऊन समजून घ्यावे असे आहे.