समाजाची अस्मिता गहाण ठेवून मंत्रिपदासाठी कधी पवारांसमोर तर कधी मोदींच्या मागे लाचारासारखे फिरणारे नेते पाहिले तर आपल्या समाजाचे आत्मभान जपणारा हा नेता अधिक मोठा वाटू लागतो.आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर भांडणारे देसाईगंज वडसाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेवबाबू उईके परवा गेले. आरंभापासून समाजवादी निष्ठा बाळगणारा आणि त्या निष्ठांच्या बाजूने आयुष्यभर उभा राहिलेला हा निष्कांचन कार्यकर्ता होता. शेतमजूर आणि भूमिहीनांच्या समस्या विधिमंडळात मांडताना आपल्या भूमिकेवर अविचल राहणारा हा प्रामाणिक लोकप्रतिनिधी होता. त्यांनी आयुष्याशी तडजोड केली नाही आणि कुणी कितीही मोठा माणूस असो त्याच्याशी मतभेद करायला ते घाबरलेही नाहीत.सुखदेवबाबू सडेतोड बोलायचे. असा परखडपणा यायला व्यक्तिगत जीवनात सचोटी, प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्याही आरोपातून मुक्त आणि निर्भय आयुष्य वाट्याला येणे आवश्यक असते. सुखदेवबाबूंना तसे जगता आले म्हणूनच ते आपल्याच समाजातील सरंजामशाहीविरुद्ध कणखरपणे लढू शकले.ग्रामीण भागातील माणसांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगार हमी योजनेला अधिक व्यापक करण्याचे श्रेय सुखदेवबाबूंना जाते. जबरनजोत धारकांचा लढा त्यातूनच उभा राहिला. पिढ्यान्पिढ्यापासून जमीन कसत असूनही त्या जमिनीची मालकी नसलेल्या महाराष्ट्रातील हजारो जबरनजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी सुखदेवबाबू सतत लढायचे. आमदार असताना एकदा त्यांनी त्यासाठी विधिमंडळाचे कामकाज ठप्प पाडले होते. आणीबाणी संपल्यानंतर रचनात्मक कार्यात स्वत:चे आयुष्य झोकून दिलेल्या विधायक कार्यकर्त्यांची एक पिढी नंतरच्या काळात तयार झाली. त्यातील मोहन हिराबाई, डॉ. सतीश गोगुलवार या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काम सुरु केले. असंघटित मजूर, लाकूड कामगारांसाठी सुरु झालेल्या या चळवळीने नंतर महाराष्ट्र व्यापला. या लढ्याचे मुख्य सूत्र होते, ‘आपण आपला मार्ग शोधृू या’ आणि त्याचे शिल्पकार होते, सुखदेवबाबू. या चळवळीचे वैशिष्ट्य असे की, समाजातील सर्व वंचित घटकांना एका कवेत घेणारी विशाल दृष्टी त्यात होती. यातून लोकसमस्यांच्या निराकरणासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि कायद्याच्या माध्यमातून लढण्याची मानसिकता घडत गेली. आमच्या समस्यांची उत्तरे आम्हीच शोधू किंबहुना ती सोडवू, हा विश्वास गरीब, निरक्षर भूमिहीन मजुरांमध्ये निर्माण झाला आणि तो सतत वाढत गेला, ही सामाजिक चळवळीतील मोठी क्रांती होती.गडचिरोलीच्या जंगलासाठी शाप ठरणाऱ्या तुलतुली, भोपाळपट्टणम, इचमपल्ली या धरणांना विरोध करण्यासाठी उभ्या राहिलेल्या ‘जंगल बचाव-मानव बचाव’ आंदोलनाचे सुखदेवबाबू महत्त्वाचे शिलेदार होते. बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा यांच्या वैचारिक पाठबळाने या आंदोलनाला बळ मिळाले. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने दडपशाही सुरु केली. पण सुखदेवबाबू आणि त्यांचे कार्यकर्ते अखेरपर्यंत ढळले नाहीत. राजकारणातून त्यांनी काहीच कमावले नाही. उलट शिक्षक असताना जे काही थोडेबहुत पैसे जमले होते तेही चळवळीत गमावले. आदिवासी समाजात त्यांच्याबद्दल असलेला आदर बड्या राजकारण्यांनी हेरला होता. तशी आमिषंदेखील त्यांना यायची. पण सुखदेवबाबू त्यांना बळी पडले नाहीत. एकदा कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकाने त्यांना विचारलेच, ‘बाबूजी, तुमच्यासोबत समाज आहे, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे तुम्हाला निमंत्रण आहे. तुम्ही का जात नाही?’ या कार्यकर्त्यांला सुखदेवबाबूंनी दिलेले उत्तर वर्तमानातील राजकीय परिस्थितीच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते कार्यकर्त्याला म्हणाले, ‘मी आदिवासी आहे. आमचा समाज भीक मागत नाही. तो स्वाभिमानी आहे. काँग्रेस-भाजपासोबत गेलो तर मला तडजोडी कराव्या लागतील, माझी फरफट होईल.’ समाजाची अस्मिता गहाण ठेवून मंत्रिपदासाठी कधी पवारांसमोर तर कधी मोदींच्या मागे लाचारासारखे फिरणारे नेते पाहिले तर आपल्या समाजाचे आत्मभान जपणारा हा नेता अधिक मोठा वाटू लागतो.- गजानन जानभोर
सुखदेवबाबू
By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST