- वसंत भोसले
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपविरोधक एक झाल्यास यश मिळते हे दिसले. यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचे धोरण राष्ट्रवादीने जाहीर केले.कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अखेर काँग्रेसनेच जिंकली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करावी लागली. कारण काँग्रेससह कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून तब्बल ३२ जागा जिंकल्या. मात्र, त्यांना शिवसेनेसह कोणताही पक्ष सहकार्य करण्यास तयार नव्हता. अखेर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचीही तयारी दर्शविली होती. काहीही करून काँग्रेस विरोधात राजकीय ताकद उभी करण्याची ती धडपड होती. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकालावरून भाजपविरोधक एक झाल्यास यश मिळते हे दिसले. यामुळेच आगामी विधान परिषदेच्या आठ जागांसाठीदेखील आघाडी करण्याचे धोरण राष्ट्रवादीने जाहीर केले.कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेच्या एका जागेसाठीही येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. सध्या ही जागा काँग्रेसकडेच आहे. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याशिवाय विधान परिषदेची जागा जिंकता येणार नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वत:चा उमेदवार निश्चित करून राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वयाने लढत दिली तर ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते. राष्ट्रवादीने तशी स्वच्छ भूमिका घेतली आहे. काँग्रेसने दिलेल्या कोणत्याही उमेदवारास आपला स्पष्ट पाठिंबा असणार आहे, असे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील ३६४ मतदारांमध्ये १२० मते राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण? याचे कोडे अद्याप सुटत नाही. महापालिका निवडणुकीत सर्वांत जास्त जागा जिंकून महापौरपदी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी नेतृत्व केलेल्या माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांचा विरोध आहे. या चार इच्छुकांमधून निवड करावी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तर ३६४ पैकी २७३ मतांची आघाडी होते. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होईल. राष्ट्रवादीचे धोरण स्पष्ट आहे. त्यामुळे अडचण आहे ती काँग्रेसचा उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्याची. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समन्वयाने आघाडीचे राजकारण करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा पटले आहे. त्या समन्वयामुळेच महापालिकेत आघाडी नसतानाही सत्ता मिळवली आहे. दोन्ही काँगे्रस परस्पर विरोधात लढत होते; पण भाजप- ताराराणी आघाडीच्या युतीचा पराभव करण्यासाठी अनेक प्रभागांत अंतर्गत तडजोडी केल्या. त्यामुळे ८१ सदस्यीय सभागृहात ४४ सदस्य निवडून आणता आले. तसाच समन्वय जिल्हा परिषदेत करावा अशी आता राष्ट्रवादीने मागणी केली आहे. कारण गत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली होती. मात्र, बहुमतास पाच जागा कमी पडल्या. तेव्हा राज्यात आघाडी करून सत्तेवर असलेल्या काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच सदस्यांचा पाठिंबा घेऊन सत्ता हस्तगत केली. त्याला चार वर्षे झाली. अखेरच्या वर्षात तरी ही सुधारणा करावी, अशी राष्ट्रवादीची मागणी पुढे आली आहे. भाजपने सत्तेवर येताच उन्माद दाखविण्याचा प्रयत्न केला, तसा काँग्रेसने केला होता. त्यामुळे गतवर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दहापैकी एकही जागा जिंकता आली नाही. यातून आघाडीच्या राजकारणाने पुन्हा यश मिळवणे आणि त्यासाठी पक्षात समन्वय करावा लागेल.काँग्रेसचे आजही अनेक स्थानिक स्वराज संस्था आणि सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहत झाली आहे. त्यातून पक्षाला बाहेर काढण्याची ताकद असणाऱ्यांकडे नेतृत्व सोपवून पक्षाला कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करावी लागणार आहे. लोकांचा पाठिंबा आहे. मात्र, नेतेगिरीची ठेकेदारी करणाऱ्यांपासून पक्ष वाचविला तरच तो तरेल, अन्यथा दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढत राहील. राष्ट्रवादीने यातूनच धडा घेऊन आघाडीच्या राजकारणाचा हात पुढे केला आहे. - वसंत भोसले