- विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
काळ मोठा कठीण आला आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे. इस्पितळात जागा नाही, प्राणवायू पुरेसा नाही, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत,औषधे नाहीत.. ही वेळ ‘तू-तू मैं-मैं’ करण्याची नाही, पण आजूबाजूला तेच घडते आहे. खरे तर असे भांडत बसण्याची ही वेळ नाही. ही वेळ फक्त प्राण वाचवण्याची आहे. एक पदरी मुखपट्टी लावत असाल तर दुपदरी लावा. वापरतच नसाल, तर वापरायला सुरुवात करा. नियम पाळा. सरकारला सहकार्य करा. अशासाठी की सरकार शक्य ते सारे करते आहे, आणि आता तुम्हाला द्यायला सरकारकडे फारसे काही उरलेले नाही. आणि हा जो काही आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चालला आहे, तो आधी थांबवा. केंद्र राज्याला दोष देत आहे आणि राज्य केंद्राला. हे आता बास! आपण भारतीय आहोत, सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत. कोणी भाजपचे नाही आणि कोणी कॉंग्रेसचे नाही. दुसऱ्या पक्षाचाही कोणी नाही. प्रत्येक जण भारतमातेचा किंवा आपल्या माता-पित्यांचा आहे. ही वेळ दुजाभाव करण्याची मुळीच नाही.
आपल्यापैकी कोणीही अशा वाईट काळाची कल्पना स्वप्नातही केली नव्हती. स्पॅनिश फ्लू, प्लेगची साथ यायची तेव्हा जगात काही ठिकाणी गावेच्या गावे नष्ट झाली, हे फक्त ऐकून माहिती होते.. आज आपण आप्तस्वकीयांच्या जगण्या-मरण्याचा संघर्ष पाहतो आहोत. माझा लोकमत परिवार खूप मोठा आहे. रोज मनुष्यबळ विभागातून कोणाकोणाच्या मृत्यूच्या बातम्या येतात, तेव्हा जीव कळवळतो. देशभरात कहर चालूु आहे. मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या प्रभावशाली लोकांनाही इस्पितळात खाट मिळणे कठीण जात आहे तर सामान्यांची काय कथा? ज्यांच्यात ताकद, क्षमता आहे ते देश सोडून उपचारासाठी मालदीव, दुबईला निघून जात आहेत. काही लोक हिल स्टेशन्सवर रहायला गेले आहेत; परंतु ही मूठभर लोकांची व्यवस्था आहे. हा अवघा देश नाही.
तूर्तास सरकार आपल्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व करत आहे. देशात कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या सतत वाढवली जात आहे. पण डॉक्टर्स, परिचारिका कोठून आणायच्या? लाखो कुटुंबांनी आपले कोणी ना कोणी गमावले हे खरेच आहे. अशा स्थितीत व्यवस्थेवर त्यांचा राग निघणे स्वाभाविक!- पण ही वेळ डॉक्टरांशी लढण्याची नाही हेही आपण समजून घेतले पाहिजे. या संकटकाळात डॉक्टर्स, परिचारिका आणि सहाय्यक मंडळी जिवाचे रान करून काम करत आहेत ते केवळ कौतुकास्पद होय. खाट मिळाली नाही किंवा प्राणवायू नसेल तर त्यात डॉक्टरांचा काय दोष? - तीही माणसे आहेत हे विसरू नका.
कोरोनाचे भय सर्वत्र पसरलेले आज आपण पाहतो आहोत. लोक बेचैन आहेत; पण हिंमत सोडावी असा याचा अर्थ नाही. लक्षात ठेवा, संयम, शिस्त, हिंमत आणि सतर्कता या शस्त्रांनी आपण कोरोनाला पराभूत करू शकतो.
- vijaydarda@lokmat.com