शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय?

By रवी टाले | Updated: June 3, 2025 11:14 IST

यूपीएससी परीक्षा प्रणालीतील अपारदर्शकता हजारो विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे कारण ठरते आहे. सर्वच प्रक्रियांबद्दल आयोगाने खुलेपणा स्वीकारायला हवा !

रवि टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

कलेक्टर (जिल्हाधिकारी) किंवा एसपी (पोलिस अधीक्षक) बनणे हे कोट्यवधी युवक-युवतींचे स्वप्न असते. दोन्ही पदांवरील व्यक्तींचे व्यापक अधिकार, रुबाब, दरारा, सोयीसुविधांचे आकर्षण हे त्यामागील कारण ! या आणि तत्सम इतर पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) द्वारा दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दहा ते बारा लाख जण अर्ज करतात. त्यापैकी पाच ते सहा लाख जणच पूर्वपरीक्षा देतात. त्यातील  दहा ते बारा हजार जण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. ती उत्तीर्ण होणाऱ्या केवळ दोन ते अडीच हजार जणांना मुलाखतीसाठी निमंत्रण मिळते आणि अंततः केवळ ८०० ते ११०० उमेदवारांची निवड होते ! स्वप्न बघणे आणि प्रत्यक्षात आणणे, यातील महदंतर या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

यूपीएससी परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता, ही परीक्षा प्रणाली  पारदर्शी असायला हवी; पण दुर्दैवाने ती गंभीर प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावर्षी तर कळसच गाठला गेला. गेल्यावर्षी २४ मे २०२४ रोजी पूर्वपरीक्षा पार पडली. निकाल १० जुलै २०२४ रोजी लागला. यावर्षीची पूर्वपरीक्षा २५ मे रोजी पार पडली आणि गेल्यावर्षीच्या पूर्वपरीक्षेची ‘आन्सर की’ (उत्तरसूची) सार्वजनिक करण्यात आली २१ मे रोजी ! निकालास दहा महिने उलटल्यावर ‘आन्सर की’ सार्वजनिक करण्यामागील कारण काय ? ‘नीट यूजी’ आणि इतर काही स्पर्धा परीक्षांच्या ‘आन्सर की’ परीक्षेनंतर लगेच सार्वजनिक केल्या जातात. मग यूपीएससी परीक्षेच्या का नाही? 

पुढील परीक्षा आणि गतवर्षीची ‘आन्सर की’ सार्वजनिक करण्यातील फरक एवढा कमी असल्याने, निकालास आव्हान देण्यासाठी वावच नसतो. ‘नीट यूजी’ परीक्षेची केवळ ‘आन्सर की’च नव्हे, तर प्रत्येक परीक्षार्थ्याची ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकादेखील उपलब्ध करून दिली जाते. पारदर्शकतेची ही पातळी यूपीएससी का गाठू शकत नाही? 

गतवर्षीच्या पूर्वपरीक्षेतील तीन प्रश्न यूपीएससीने चक्क बाद ठरवले; त्या प्रश्नांची उत्तरे अचूक देणाऱ्यांवर हा अन्याय नव्हे का? मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्यांपैकी ज्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली असतील, त्यांना फायदा पोहोचवला गेला नाही का? हे काय गौडबंगाल आहे? 

परीक्षार्थी तीनपैकी कोणत्याही टप्प्यात अपयशी ठरल्यास, त्याला पुढील वर्षी पुन्हा सर्व टप्प्यांतून जावे लागते. तिन्ही टप्प्यांमध्ये निकालाबाबत पुरेशा तपशीलांचा अभाव जाणवतो. उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धत, गुणांकनाचे निकष, मुलाखतीचे गुण का आणि कसे दिले, याबाबत आयोग कोणतीही माहिती उघड करत नाही. त्यामुळे निवड न झालेल्यांमध्ये गोंधळ आणि नाराजी वाढते. यूपीएससी परीक्षार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध होत नसल्याने स्वतःचे मूल्यमापन करता येत नाही. गुण पुन्हा तपासण्याची कोणतीही संधी नसते. अनेक शिक्षणतज्ज्ञ या प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

यूपीएससीच्या मुलाखतीचे २७५ गुण अंतिम यशात निर्णायक ठरू शकतात; परंतु मुलाखतीदरम्यान विचारले गेलेले प्रश्न, उमेदवाराचे उत्तर, त्याचे मूल्यमापन आणि मुलाखत मंडळाची शिफारस याबाबत स्पष्टता नसते. एखाद्या उमेदवारास एका वर्षी २०० पेक्षा जास्त गुण मिळतात आणि दुसऱ्या वर्षी केवळ १२० !  ही बाब वैयक्तिक पूर्वग्रह किंवा व्यक्तीनिष्ठ मूल्यांकनाच्या आरोपांना खतपाणी घालते. 

आयोगाच्या प्रक्रियांविषयी माहितीच्या अधिकारात केलेल्या  अर्जांना ‘मुलाखत प्रक्रियेतील गोपनीयता’ या कारणाखाली नकार देण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये उमेदवारास त्याची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला असतानाही, यूपीएससी त्याचा व्यापक अवलंब करत नाही.

या अपारदर्शकतेमुळे हजारो परीक्षार्थी मानसिक दबावाखाली येतात. काही जण वर्षानुवर्षे तयारी करूनही अंतिम यशापासून दूर राहतात आणि प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव हे त्यामागील मुख्य कारण मानतात. या पार्श्वभूमीवर यूपीएससीने काही सुधारणा तातडीने करणे गरजेचे आहे. पूर्वपरीक्षेची ‘आन्सर की’ निकाल जाहीर होताच सार्वजनिक करायला हवी. मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘स्कॅन’ करून विद्यार्थ्यांना ई-मेलने किंवा पोर्टलवरून उपलब्ध करून द्यायला हव्या. सोबतच मूल्यांकनासाठीचे मापदंड स्पष्ट करायला हवे. मुलाखत प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते मागणीनुसार उपलब्ध करून द्यायला हवे. गुणांबाबत न्यायिक पुनरावलोकनाची संधी मिळायला हवी.

यूपीएससी भारतीय लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव लोकशाहीच्या मूल्यांवरच आघात आहे. एकीकडे सरकार ‘डिजिटल इंडिया’, ‘ई-गव्हर्नन्स’सारख्या उपक्रमांवर भर देत असताना, दुसरीकडे यूपीएससी ब्रिटिशकालीन गोपनीयता जोपासत आहे; हे अजिबातच योग्य नव्हे !

ravi.tale@lokmat.com

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग