शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

By shrimant mane | Updated: November 11, 2023 08:36 IST

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे.

- श्रीमंत माने(संपादक, लोकमत, नागपूर)

दिल्ली-मुंबई महानगरांसह उत्तर व मध्य भारतातील वायुप्रदूषणाच्या बातम्या थरकाप उडविणाऱ्या आहेत. लाखोंचे श्वास कोंडलेत. कोरोना महामारीपेक्षा गंभीर स्थिती आहे. उपाय शोधताना सरकारे मेटाकुटीला आलीत. फटाके, बांधकामांवर बंधने घातली आहेत. वाहनांसाठी सम-विषम प्रणाली अंमलात आलीय. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या आधीच दिल्या आहेत. धुळीसाठी कृत्रिम पावसाचा उपाय विचारात आहे.  काहीही करा; पण लोकांचे प्राण वाचवा, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली. दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर असून, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागत आहेत. प्रदूषणामुळे राजधानीतल्या रहिवाशांचे आयुष्य सरासरी बारा वर्षांनी, तिच्याभोवतीच्या शहरांमधील नागरिकांचे आयुष्य अकरा-बारा वर्षांनी, तर मुंबईकरांचे आयुष्यही दहा वर्षांनी कमी होते.  

तथापि, दिवा फडफडत असला तरी अजून तो पूर्णपणे विझलेला नाही. आधीचे असे सहा दिवे मात्र विझलेत. होय, पृथ्वीच्या आरोग्याच्या ठळक नऊपैकी सहा चाचण्यांचा रिपोर्ट चिंताजनक आहे. संशोधनाच्या भाषेत त्यांना प्लॅनेटरी बाउंड्रीज म्हणतात. हवामानबदल, बायोस्फिअर इंटेग्रिटी (यात जैवविविधता आलीच), शुद्ध पेयजल उपलब्धता, जमिनीचा वापर आणि पोषण द्रव्यांमधील प्रदूषण तसेच नॉव्हेल एंटिटीज अर्थात थेट मातेच्या दुधातून अपत्याच्या शरीरात प्रवेश करणारे मायक्रोप्लॅस्टिक तसेच किरणोत्सर्गी कचरा या मानवनिर्मित संकटांनी धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. नऊपैकी सहा चाचण्यांचे निष्कर्ष चिंताजनक असणे म्हणजे रुग्ण व्हेंटिलेटरवरच आहे. दिलासा इतकाच, की प्रिय वसुंधरेच्या आरोग्याची तीन लक्षणे थोडी ठीक आहेत. वायुप्रदूषण, ओसियन ॲसिडिफिकेशन व ओझोन डिप्लेशन या तीन चाचण्यांची स्थिती सध्या अगदीच चिंताजनक नसली तरी निश्चिंत राहण्यासारखीही नाही. 

जगभरातील हजारो अभ्यासकांनी एकत्र येऊन पृथ्वीचे आरोग्य तपासले. त्यासाठी तब्बल दोन हजार अभ्यास केले. या संशोधनाचे निदान सायन्स ॲडव्हान्सेस नियतकालिकात गेल्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाले. डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठाच्या कॅथरिन रिचर्डसन त्याच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणतात, नऊपैकी सहा गोष्टींमध्ये नापास असलो तरी सारे काही संपलेले नाही. हे रक्तदाब व हृदयविकाराच्या परस्पर संबंधासारखे आहे. रक्तदाब वाढला की हृदयविकाराचा झटका येतोच असे नाही. परंतु, त्याची शक्यता कैकपटीने वाढते. थोडक्यात, प्रयत्न केले तर विझलेले दिवेही पेटू शकतात. जागतिक तापमान वाढ व ओझोन थरासाठी जग एकत्र येणे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसणे यातून हेच स्पष्ट होते. 

कारण, बिघडले ते काल-परवाचे नाही. ही दहा हजार वर्षांची प्रक्रिया आहे. हिमयुग संपून होलोसीन युग प्रारंभ झाले तेव्हाच शेतीचा शोध लागला. एकेका टप्प्यावर पृथ्वीची तब्येत खालावत चालली. आजाराच्या कुरबुरी वाढल्या. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. आजारांची कारणे एकमेकांशी निगडित आहेत. हवामान बदल व जैवविविधतेचा ऱ्हास किंवा खतांच्या अतिरेकी वापरातून जमिनीत फॉस्फरस व नायट्रोजनचा मारा, इंधन व खाद्यान्नासाठी प्लान्ट बायोमासचा अतिरेकी वापर, समुद्रात शैवालाचे थर, महासागराच्या काही भागात जीवसृष्टी संपुष्टात येणे, ओसियन डेड झोन तयार होणे, अशी ही दुष्परिणामांची गुंतागुंत आहे.

प्लॅनेटरी बाउंड्रीज नावाची संकल्पना २००९ साली पहिल्यांदा जगापुढे आली. २०१५ च्या अहवालाने जगाला सावधगिरीचा इशारा दिला. यंदा तुलनेसाठी आकडेवारीचा आधार घेतला गेला. अर्थातच थोडा सैल. उदा. पृथ्वीतलावर शेतीला सुरुवात झाली आणि तिच्या माध्यमातून निसर्ग ओरबाडला जाऊ लागला, संसाधनांची होरपळ सुरू झाली तेव्हा हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २८० पीपीएम होते. संशोधनासाठी ते ३५० पीपीएम गृहीत धरले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जगात हे प्रमाण सरासरी ४१९ पीपीएम होते. अर्थात, ही जगाची सरासरी आहे. दिल्ली-मुंबईची स्थिती त्याहून कितीतरी गंभीर आहे. हा सातवा दिवा विझू नये यासाठी आडोसा धरण्याची नितांत गरज आहे.  

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023