शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:55 IST

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात. ते खिडकीबाहेर दिसले तरी मुले लगेच शिकण्यात मग्न असल्याचे भाव चेहऱ्यावर आणतात. हेडमास्तर निघून गेले की चुळबुळ, गोंधळ सुरू होतो. पण हेडमास्तर स्वत: क्लास घ्यायला येणार असतील तर? जाम टेन्शन येतं. असेच टेन्शन गेले तीन दिवस भाजपाच्या नेत्यांनी अनुभवले. हेडमास्तरी खाक्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा तीन दिवसांचा क्लास घेतला. क्लास टीचर देवेंद्र फडणवीस यांच्या शिकवण्यावर (कारभारावर) त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त तर केलेच, शिवाय त्यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सांगून टाकले. भाजपा श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यावरून स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलन नीट हाताळले नाही, तुरीच्या मुद्यावर सरकारची पंचाईत झाली असे ‘फीलर्स’ दिल्लीत गेले काही दिवस पाठविले जात होते. त्यामागे फडणवीस यांना हटवून अन्य कुणाला मुख्यमंत्री करा, हा उद्देश नव्हता. कारण सहावा मजला आपल्यासाठी दूर आहे, याची जाणीव भाजपातील सर्वांनाच आहे. पण गेल्या काही महिन्यांतील अशांत वातावरणासाठी फडणवीस यांना लक्ष्य करावे आणि त्यानिमित्ताने श्रेष्ठींच्या दरबारी त्यांना किमान नजर तरी लागावी, असा उद्देश होता. शहा यांनी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे मुंबई भेटीत बिनदिक्कतपणे सांगत सर्वच शक्यतांवर पडदा टाकला. मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत. सर्व ठिकाणी फक्त त्यांचेच फोटो असतात, अशा कुरबुरीदेखील दोन मंत्री दबलेल्या आवाजात करीत असतात. मात्र, फडणवीस यांचे टीम वर्क अतिशय चांगले आहे आणि ते सगळ्यांना घेऊन राज्याचा कारभार करीत असल्याचं प्रमाणपत्रही शहा यांनी देऊन फडणवीस यांना शाबासकी दिली. करडी नजर आणि शिस्तीच्या त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुणाची प्रशंसा करणे, हे दुरापास्तच असल्याचे भाजपाचे नेते सांगतात. या पार्श्वभूमीवर शहांनी केलेलं कौतुक महत्त्वाचे ठरते. राज्यात मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार असल्याचे विधान शहांच्या मुंबई भेटीच्या एक दिवस आधी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. तथापि, मध्यावधी होणार नाही, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे अमित शहांनी त्याच्या तिसऱ्याच दिवशी सांगून टाकले. भाजपाशिवाय मध्यावधी निवडणूक आज कोणत्याही पक्षाला आर्थिकदृष्ट्या सोसणार नाही. आता मध्यावधीची खुमखुमी असलेले शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष उद्या खरेच निवडणूक लागली तर अर्धे रिकामे झालेले दिसतील, हे लिहून ठेवा. एकदाची मध्यावधी निवडणूक घेऊनच टाकावी आणि पूर्ण बहुमत मिळवून शिवसेनेची साथ सोडावी, असे भाजपातील काही नेत्यांच्या मनात आहे. मात्र, मध्यंतरी संघर्ष यात्रेच्या प्रवासात एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी उद्या मॅडम वा साहेब काहीही म्हणोत यापुढे विधानसभेची निवडणूक युती करूनच लढवायची, असे ठरवून टाकले आहे. उद्या मध्यावधी झालीच तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढतील. भाजपाने सर्वच मतदारसंघांमध्ये ताकद वाढविण्याची भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेशी युती करण्याचा भाजपाचा मूड नाही. १२२ जागा जिंकलेल्या भाजपाला जागावाटपात शिवसेनेपेक्षा कमी वाटा कदापिही मान्य होणार नाही. शिवसेना लहान भाऊ होणे मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची शक्यता नाही. म्हणजे हे दोघे एकमेकांविरुद्ध लढतील आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील. या दोघांचे एकत्र येणे अपरिहार्य असले तरी त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल. त्यामुळे आज हा पक्षदेखील मध्यावधीच्या मूडमध्ये नाही. निवडणूक कोणालाही नको आहे, असा त्याचा अर्थ आहे. - यदु जोशी