शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांची विज्ञाननिष्ठा

By admin | Updated: September 20, 2015 23:41 IST

अवैज्ञानिक आणि कालबाह्य रुढींचा त्याग करा हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपुरात केलेला उपदेश संघ परिवारातील श्रद्धाळूंएवढाच साऱ्या समाजालाही मार्गदर्शक ठरावा असा आहे

अवैज्ञानिक आणि कालबाह्य रुढींचा त्याग करा हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपुरात केलेला उपदेश संघ परिवारातील श्रद्धाळूंएवढाच साऱ्या समाजालाही मार्गदर्शक ठरावा असा आहे. कालबाह्यच नव्हे तर समाजाला मागे नेणाऱ्या रुढींचे पालन एकट्या संघजनांकडूनच होते असे समजण्याचे कारण नाही. आपल्या जातीचे शुद्धत्व राखण्यासाठी खून करणाऱ्या आणि आपल्याच मुलींवर बलात्काराचे आदेश देणाऱ्या खाप (जात) पंचायतींकडूनही ते होते. त्यात भाग घेणारी माणसे संघात जाणारी नसतात. दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांची हत्त्या करणारी आणि त्या हत्त्या धर्मरक्षणार्थ करण्यात आल्याचे बेशरमपणे सांगणारी माणसेही समाजात असतात. आपल्या जुनकट आणि बावळट श्रद्धांना उराशी कवटाळून आसाराम बापूपासून श्री श्री पर्यंतच्या बुवाबाबांचे चरणतीर्थ घेणारी आणि त्यांच्या प्रवचनात नाचणारी माणसे सर्वत्र आहेत. आपली गरिबी कायम राखून या बुवाबाबांच्या तिजोऱ्या कोट्यवधींनी भरून देणारेही आपल्यात फार आहेत. अंधश्रद्धेने भारलेल्या निरक्षर व अडाणी वर्गाचाच हा प्रश्न राहिला नसणे हीच यातील खरी आपत्ती आहे. देशाला शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉ. दीनानाथ बात्रांसारखी माणसेही या गावंढळपणात मागे नाहीत. प्राचीन काळी आपल्या देशात पुष्पकसारखी विमाने होती आणि प्रभू रामचंद्र त्यातून प्रवास करीत असत असे अचरट निबंध वैज्ञानिकांच्या जागतिक परिषदात वाचणारे विद्वानही आपल्यात थोडे नाहीत. गोमुत्राच्या प्राशनाने आणि गायीच्या शेणाच्या सेवनाने आजार बरे होतात, मृतांचे आत्मे कावळ्यांच्या रूपाने भूतलावर येतात इथपासून यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि गोदेत शाहीस्नान केले की सगळी जुनी पातके धुऊन निघून स्वर्गादिकाचा मार्ग प्रशस्त होतो अशा भाकड कथा पसरविण्यात ही ज्ञानी माणसेही मागे नाहीत. सिनेनटांची देवळे उभारणे, सत्तेवरील पुढाऱ्यांच्या दैवतासारख्या पूजा करणे आणि समाजाच्या जराही कामी न येणाऱ्या गोसावड्यांच्या स्नानासाठी अवर्षणग्रस्त भागातील धरणांचे पाणी सोडणे हा सारा याच आंधळ्या भक्तिभावाचा परिणाम आहे. तो करणाऱ्यात सुशिक्षित नागरिकांएवढेच सरकारांनाही सामील होताना पाहावे लागणे हा यातला सर्वांत मोठा दैवदुर्विलास आहे. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्राचीन भारतात प्लॅस्टिक सर्जरीची पद्धत होती आणि आजचा सोंडेचा गणपती हे त्याच सर्जरीचे प्रतीक आहे असे सांगून मध्यंतरी एक मोठा विनोद केला होता. सरसंघचालकांचा आताचा संदेश इतर कोणी गंभीरपणे घेतला नाही तरी संघ कार्यकर्त्यांएवढाच सगळ्या विवेकी जनांनी तो तसा घ्यावा ही अपेक्षा येथे चुकीची ठरू नये. देशातील ज्या पाच राज्यात संघ नियंत्रित भाजपाची सरकारे आहेत त्यात तर त्याविषयीचे कठोर कायदे करायलाही हरकत नाही. बुवा, बाबा, बापू आणि महंतांनीच या देशात अंधश्रद्धा पसरविल्या नाहीत, त्यांची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या परंपराही देशात आहेत. त्या केवळ हिंदू धर्मातच नाहीत मुसलमान, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातही त्या आहेत. आताचा धोका या परंपरांनी त्यांचे आग्रह साऱ्या समाजावर थोपविण्याचा प्रयत्न करणे हा आहे. कुणाच्या पर्युषण पर्वात मांसाहारावर बंदी, कुणाच्या नवरात्रीत मांसविक्रीवर बंदी, कुणाच्या रोजांखातर दिवसाची भोजनबंदी आणि त्यासोबत या साऱ्या धर्मांच्या उन्नयनावर समाजमनाची बंदी. आपण कोणत्या जगात आणि कितव्या शतकात जगत आहोत याचा प्रश्न पडावा असे हे वर्तमान आहे. त्यातून कोणाच्या धर्मभावना कशाने दुखविल्या जातील याचा आता नेम उरला नाही. आम्हाला यल्लमाच्या जोगतिणी चालतात, हुसेनची चित्रे चालत नाहीत, आमच्या माणसांचे हुडदूस चालतात, त्यांचे हुडदंग खपत नाहीत. स्वधर्मप्रेमाहून परधर्मद्वेष आणि डोळस जगण्याहून अंधश्रद्ध राहण्यातले खोटे सुरक्षित मानस यातला हा संघर्ष आहे. तो संपविणे ही केवळ पुरोगामी विचारवंतांची जबाबदारी नाही. त्यासाठी धर्मावर अधिकार सांगणाऱ्यांनीच आता पुढे आले पाहिजे. मोहन भागवत यांनी या संदर्भात घेतलेला पुढाकार त्याचमुळे महत्त्वाचा व स्वागतार्ह आहे. राजाराम मोहन रॉय यांनी १९व्या शतकाच्या पूर्वार्धात सती बंदीसाठी आंदोलन उभारले. परिणामी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा केला. तरीही अलीकडच्या काळात राजस्थानची रुपकुंवर सती गेली. (वा तिला तसे जायला भाग पाडले गेले.) दुर्दैव हे की १९व्या शतकाच्या आरंभी थांबविली गेलेली ही दुष्ट प्रथा २०व्या शतकाच्या उत्तरार्धात उजागर झाली तेव्हा तिचे स्वागत करायला तेव्हाच्या भाजपाच्या उपाध्यक्ष विजयाराजे शिंदे याच पुढे आल्या. या विजयाराजांच्या कन्या व कमालीचे अत्याधुनिक जीवन जगणाऱ्या वसुंधरा राजेच आता राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत. नेमक्या त्या राज्याच्या राजधानीत त्यांच्याच पक्षाच्या मातृसंस्थेचे प्रमुख असलेल्या मोहन भागवत यांनी विज्ञाननिष्ठा आणि आधुनिकीकरण यांचे सुतोवाच करावे हा योगायोग मोठा आहे. त्याचे नुसते शाब्दिक स्वागत उपयोगाचे नाही, त्याचा सक्रिय स्वीकारच आवश्यक आहे. भागवत यांचा हा संदेश संघाबाबत ‘गैरसमज’ बाळगणाऱ्या विवेकवाद्यांनीही समजून घ्यावा असा आहे.