- सुधीर महाजनज्योतिषाच्या भाषेत ग्रहमान उच्चीचे असले अन् शनी, राहूसारखे ग्रह वक्री असले तरी भाग्यात अडथळे येतात असे म्हणतात. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा; पण त्याच्या भाग्यात वक्री कोण हे न उलगडलेले कोडे आहे. ‘‘त्यांनी ताजमहाल बांधला; तुम्हाला साधा रस्ता तयार करता येत नाही. तुमचे अभियंते जे काम करतात त्याची खरे तर त्यांनाच लाज वाटायला पाहिजे,’’ या कानपिचक्या सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिल्या. न्यायमूर्ती टी. एन. ठाकूर यांनी शेलक्या शब्दांत सरकारचे कान उपटले. आग्रा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरचे स्थळ. आग्ऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची तुलना महाराष्ट्रातील रस्त्यांशी होऊ शकते. आग्ऱ्याप्रमाणे वेरूळ-अजिंठा हीसुद्धा जागतिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. गेल्या आठवड्यात चीनचे उपाध्यक्ष लियांग चाओ अजिंठ्याला येऊन गेले. आपल्या रस्त्यावरून धक्के खात, खड्डे चुकवीत गेले; पण त्यांनी तक्रार केली नाही, की नाराजी व्यक्त केली नाही. पाहुण्यासारखे वागले, आपले उणे-दुणे काढले नाही; पण मंत्रालयाच्या पातळीवर कुठेतरी कुरबुरीचा सूर निघाला असावा म्हणूनच ऐन दिवाळीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी घाईने आले आणि अजिंठ्याच्या रस्त्याची अवस्था पाहून अचंबित झाले. त्यांनी अधीक्षक अभियंते आहेर यांच्यावर कारवाई करीत या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा करीत दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा आदेश काढला. एखाद्या अधिकाऱ्याची तडफ कायम टिकून राहते त्याचे हे उदाहरण. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम स्मरणात राहते.अजिंठ्याच्या रस्त्याचे भाग्य उजळत नाही. घोषणा मात्र खूप होतात. ज्योतिषाच्या भाषेत ग्रहमान उच्चीचे असले अन् शनी, राहूसारखे ग्रह वक्री असले तरी भाग्यात अडथळे येतात असे म्हणतात. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा; पण त्याच्या भाग्यात वक्री कोण हे न उलगडलेले कोडे आहे. १९९६ साली साडेतीनशे कोटी रुपये खर्चून दुपदरीकरण केले. त्यावेळी काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव होता, तो गुंडाळला गेला. त्यानंतर त्याच्या चौपदरीकरणाच्या घोषणाही झाल्या. आता कुलकर्णींच्या आदेशाची अंमलबजावणी केव्हा होते, याची प्रतीक्षा आहे. १०० कि.मी. अंतरासाठी तीन तास लागतात. या रस्त्यावर सव्वासातशे अतिक्रमणे आहेत. वाहतुक कोंडी ही नित्याची बाब. अजिंठ्याच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी हे दिव्य पार करावे लागते; परंतु बांधकाम विभागाला जाणीव नाही. आता या रस्त्यासाठी ३० कोटी मंजूर केले.औरंगाबाद-अजिंठा-फर्दापूर-पहूर-जामनेर- मुक्ताईनगर हा रस्ता पुढे इंदूरला जोडणारा. याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा झाली. आंध्रप्रदेश, कर्नाटकाला, मध्यप्रदेश, राजस्थानला जोडणारा हा जवळचा मार्ग. यावरून रोज १० हजार वाहने धावतात. त्यातील ६० टक्के जड वाहने आहेत. याच निकषावर त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय झाला. शिवाय दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आजपर्यंत दुर्लक्षित राहिला, हीच खेदाची बाब.पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व असतानाही दखल घेतली गेली नाही. अजिंठ्यास दरवर्षी पाच लाख पर्यटक भेट देतात. वेरूळला ११ ते १२ लाख. अजिंठ्याकडे पर्यटक न वळण्याचे कारण खराब रस्ता आहे. औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. अजिंठा, वेरूळ आणि शेजारी विदर्भातील लोणार ही ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण असले तरी पायाभूत सोयी हा कायमचा प्रश्न आहे. शिर्डी-वेरूळ-अजिंठा अशा वेगळ्या मार्गासाठीही २००६ मध्ये पाहणी झाली होती; परंतु पुढे त्याचे काय झाले हे साईबाबांनाच माहीत. वेरूळ, अजिंठा, दौलताबाद, पितळखोरा लेणी, औरंगाबाद या पर्यटनस्थळांना दरवर्षी ५० लाख पर्यटक भेट देतात. पर्यटन हा या जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय होण्याची क्षमता आहे; पण नियोजनबद्ध विकासाचीच वानवा आहे. एका रस्त्यामुळे काय होऊ शकते. गौतम बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दाखविला, अजिंठ्याच्या महामार्गाचे काय हा प्रश्न उरतोच.