अर्थमंत्री अरुण जेटली गेल्या अनेक दिवसांपासून आणि हाती लागेल त्या व्यासपीठावरुन व्याजाचे दर कमी करण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेला सुचवित, विनवित आणि सुनावितही होते. परंतु या वरिष्ठ बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन ऐकून न ऐकल्यासारखे करीत होते. त्यांच्या मते देशातील चलनवाढीचा आणि महागाईचा दर उतरणीला लागल्याचे दिसत असले तरी त्याचा अर्थ व्याजदर कमी करुन चलनात जास्तीचा पैसा खेळविण्याच्या दृष्टीने तितकीशी अनुकूलता आलेली नाही. राजन कोणाचेच काही ऐकत नाहीत, हाती धरलेली शिक्षकी छडी सोडायला तयार नाहीत पण त्यांनी किमान पाव टक्क््याने तरी व्याजदर कमी करावेत अशी देशातील समस्त उद्योग आणि व्यवसाय यांची अपेक्षा असताना त्यांनी व्याजदरात या अपेक्षेच्या दुप्पट म्हणजे अर्धा टक्क््याची कपात करुन साऱ्यांनाच आश्चर्याचा गोड धक्का दिला आहे. या गोड धक्क््याचे प्रतिबिंब लगेच भांडवली बाजाराच्या निर्देशांकाच्या उसळीत दिसूनही आले. अर्थात राजन यांनी हा निर्णय जाहीर करताना वृद्धिदराच्या इष्टांकात मात्र दोन दशांशांनी कपातही केली आहे. येत्या जानेवारीत देशातील चलनवाढीचा दर सहा टक्क््यांच्या आत असावा अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा होती. पण तो आजच अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे ५.८टक्के झाल्याने राजन यांना व्याजदरातील कपात जाहीर करण्यासाठी निश्चितच एक अनुकूलता प्राप्त झाली. आपले चौथे द्विमासिक पतधोरण जाहीर करताना राजन यांनी व्याजदरात अशी घसघशीत कपात जाहीर केली असली तरी बँकांसाठीचा तरलता निर्देशांक (कॅश रिझर्व्ह रेशो) चार टक्क््यांवरच कायम ठेवला आहे. पण त्यामुळे बँकांच्या कर्ज वितरणावर फारसा फरक पडण्याचे कारण नाही. कारण मुळातच त्यांच्याकडील कर्जवाटपासाठी उपलब्ध निधी आणि मागणी यातील प्रमाण व्यस्त होत चालले होते. चालू आर्थिक वर्षात आजवर करण्यात आलेली व्याजदरातील कपात जमेस धरता एकूण कपात तब्बल सव्वा टक्का भरते. ही कपात परदेशस्थ उत्पादक आणि गुंतवणूकदार यांना आकर्षित करु शकेल असा विश्वास भांडवली बाजाराने व्यक्त केला आहे, पण त्याचवेळी कपातीचा लाभ बँकांनी थेट उपभोक्त्यांपर्यंत पोचता केला पाहिजे अशी अपेक्षा रघुराम राजन यांनी केली आहे. परंतु आजवरचा याबाबतीतला अनुभव वेगळेच काही सांगतो. जेव्हां केव्हां रिझर्व्ह बँक मूलगामी व्याजदरात कपात करते तेव्हां माध्यमांमधून गृह आणि वाहनकर्ज स्वस्त होणार आणि अगोदरच ज्यांनी अशी कर्जे उचलली आहेत त्यांचे मासिक हप्ते कमी होणार अशा बातम्या येत असतात. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. व्याजदरात वाढ झाल्यानंतर ज्या चपळाईने बँका मासिक हप्त्यांच्या रकमेत वाढ करतात ती चपळाई व्याजदर कमी होतो तेव्हां अस्तंगत होते. रघुराम राजन यांच्या बुधवारच्या घोषणेला एक वेगळी किनारदेखील आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या प्रत्येक परदेश दौऱ्यात विदेशस्थ उद्योगांना भारतात येण्याचे आमंत्रण देताना काही सवलतीही जाहीर करतात. त्यावर विख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी अलीकडेच नापसंती व्यक्त करताना ‘आम्ही (म्हणजे भारतीय उद्योग व व्यवसायिक) का सावत्र मुले आहोत’?, असा जाहीर सवाल केला आहे. राजन यांनी त्यांच्या प्रश्नाला कृतीनेच उत्तर दिले आहे, असे म्हणता येईल. पण मग बजाज यांच्याच धाटणीचा प्रतिप्रश्न विचारताना, एतद्देशीय उद्योग आणि व्यावसायिक इथल्या बाजारपेठेला व इथल्या ग्राहकाला कितपत सख्ख्या पोरांची वागणूक देत आले? नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी देशाने आर्थिक उदारीकरणाचे आणि मुक्त व्यापाराचे धोरण स्वीकारण्यापूर्वी जरी भारतात परमिट आणि लायसेन्स राज होते तरी उद्योगांना एक अत्यंत जाड संरक्षण उपलब्ध होते. हे संरक्षण प्राप्त करुन येथील उद्योगांनी स्वत:ला भक्कम औद्योगिक आणि आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करुन घेतले पण ग्राहकसेवेचा विचार चुकूनही त्यांच्या मनाला कधी शिवून गेला नाही. सरकार वेळोवेळी जाहीर करीत असलेल्या अविकसीत विभागांमध्ये जाऊन नवनव्या सवलती पदरात पाडून घ्यायच्या, आधीचे कारखाने बंद पाडायचे, करात सवलत आणि जकातीत माफी द्या अन्यथा जातो आम्ही परराज्यात अशा धमक्या देत सवलती उपटायच्या पण ग्राहक तसेच कोरडे ठेवायचे, हाच येथील उद्योगांचा खाक्या राहिला. मोटार उद्योग हे याचे ढळढळीत उदाहरण. अवघ्या तीन आणि खरे तर दोनच उद्योगांकडे मोटार निर्मितीचे परवाने होते. वर्षानुवर्षे आपल्या उत्पादनात त्यांना बदल करावा, ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन आपल्या उत्पादनात काही बदल करावेत असे कधीही वाटले नाही. जपानमधील सुझुकीने देशात मारुती मोटार आणली आणि मग या साऱ्यांचे धाबे दणाणले. ‘देखभाल शून्य’ उत्पादन कसे असते याचा वस्तुपाठ मारुतीने घालून दिला. उदारीकरणानंतर मग अनेक नामांकित उत्पादने भारतात आली. तीव्र स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी देशी मोटार उद्योगांनी काही जुजबी उपाय करुन पाहिले पण अखेर साऱ्यांनी एकेक करुन माना टाकल्या. रघुराम राजन यांनी आता येथील उद्योग म्हणजे सवतीची पोरं नाहीत हे कृतीने दाखवून दिले असल्याने सारे काही या सख्ख्या पोरांवर अवलंबून आहे. चोख सोन्याला मामा जामीन लागत नाही एवढे त्यांनी बरीक लक्षात ठेवावे म्हणजे झाले!
रघुराम राजन सवतीच्या पोरांना पावले!
By admin | Updated: September 29, 2015 22:38 IST