शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

उद्धव ठाकरेंचे पुण्याहून पुणतांबा

By admin | Updated: June 22, 2017 01:23 IST

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते. योगायोगाने राज्यात सध्या पुणतांबा हे गाव चर्चेत आहे. पुणतांबातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेकांना या गावाची वाट तुडवणे भाग पडले आहे. ज्यांच्या गावीही (ध्यानीमनी) हे गाव नव्हते त्यांनाही ते शोधावे लागले. पुणे, मुंबई या महानगरांच्या पलीकडे एक पुणतांबा आहे, अन् त्याचे काही प्रश्न आहेत. तेथेही मोठा मतदार आहे, तो संप करु शकतो, राज्य हादरवू शकतो, हा धडा पुणतांबाने राज्याला दिला. हा इतिहासच घडला आहे. पण, जे पक्ष व नेते आज पुणतांबाची वाट तुडवताहेत ते अगदी सरळधोपटच येताहेत का? याबाबत साशंकता आहेतच. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आता पुणतांबेकरांच्या वाटेने निघाले आहेत म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. २५ जूनला ते येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे आत्ता इतक्या उशिराने पुणतांबाला का? असा प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित होऊ शकतो. तो होणारच. शेतकरी आंदोलनाच्या काळात ते परदेशात होते म्हणून त्यांना हा उशीर होतोय हे एक कारण झाले. ते खूपच तत्कालिक व वैयक्तिक कारण झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या या कारणाशी काहीही घेणेदेणे नसणार. एकूणच एवढी वर्षे सेना कोठे हरवली होती? असा प्रश्न शेतकरी व शिवसैनिकांनाही पडू शकतो. सेना पुणतांबात आज पोहोचत नाही. शिवसेनेची नगर जिल्ह्यातील पहिली शाखा पुणतांबात स्थापन झाली. पुणतांबाचे सुहास वहाडणे हे सेनेचे जिल्हाप्रमुख होते. हे गाव म्हणजे संघाचाही बालेकिल्ला आहे. आजही पुणतांबात संघाची प्रभात शाखा, सायंशाखा व रात्र शाखा भरते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे हे पुणतांबाचेच. ज्या विचारांचा हे गाव बालेकिल्ला आहे त्याच विचाराचे सरकार राज्यात व देशात आज सत्तास्थानी आहे. असे असताना पुणतांबा संपावर गेले. हा संप सेना-भाजपचे यश समजायचे की अपयश? ठाकरे हे पुणतांबेकरांशी संवाद साधायला येताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, सरकार त्यांचेच असताना शेतकऱ्यांशी मंत्रिमंडळातून संवाद साधायचा की पुणतांबातून? हा प्रश्न सेनेला विचारला जाणार. म्हणूनच ‘पुण्याहून पुणतांबा’ ही म्हण सेनेच्या या नीतीलाही लागू पडते. एकाच वेळी सरकार व पुणतांबा हे दोन्हीही सेनेला सांभाळायचे आहे, असे दिसते. शेतकरी अस्वस्थ आहे व आपण महानगरी प्रश्नातच अडकून पडलो, तर सेनेला ग्रामीण भागात भवितव्य नाही, हे सेनेनेही ओळखले आहे. नगरसारख्या जिल्ह्यातही सेनेची पीछेहाट झाली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व एकूणच ग्रामीण प्रश्नांशी सेनेचा संवाद खुंटला आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा एकही बडा नेता जिल्ह्यात फिरकला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे स्वत:ही प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. या जिल्ह्यात सेनेकडे सध्या फक्त एक आमदार व खासदार आहे. नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यात पक्षाची ही अवस्था आहे. म्हणूनच ठाकरेंना बहुधा पुणतांबा आठवले, असाही या दौऱ्याचा एक अर्थ निघतो. समृद्धी महामार्ग नगर जिल्ह्यातूनही जातो. याही शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत. ठाकरे पुणतांबातून पुन्हा एकदा सेनेला उभारीची व शेतकरी प्रश्नांना हात घालण्याची हाक देतील, अशी शक्यता आहे. फडणवीस सरकारवर दबाव ठेवण्याची त्यांची जुनी रणनीती याही दौऱ्यात त्यांच्या सोबत आहेच. पुणतांबेकरांच्या भेटीनंतर शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्त्वत:’ ‘निकष’ हे शब्द बाजूला करून ठाकरे सरकारला ‘सरधोपट’ पुणतांबात पोहोचविणार का? यावर त्यांच्या या दौऱ्याचे फलित ठरेल. असे झाले तरच ठाकरे सरधोपट पुणतांबाला निघालेत, असे म्हणता येईल. - सुधीर लंके