बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर बनविण्याच्या उद्देशाने, राजस्थानातून दोन ट्रक भरून दगड अयोध्येत पोहचल्याच्या बातमीने, गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेला राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मुद्याच्या साहाय्याने राष्ट्रीय राजकारणातील एक ध्रुव म्हणून पुढे आलेल्या भारतीय जनता पक्षाने, लोकसभा निवडणुकीदरम्यान हा मुद्दा संपूर्णपणे गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर पार पडलेल्या विविध विधानसभांच्या निवडणुकांदरम्यानही कुठेही या मुद्याची अजिबात चर्चा झाली नाही. असे असताना आता अचानक अयोध्येत दोन ट्रक भरून दगड पोहचल्याची बातमी येते, हे वरकरणी दिसते तेवढे साधे नक्कीच नाही. या बातमीचा थेट संबंध, तोंडावर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी, निश्चितपणे आहे. दिल्ली आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे सपाटून मार खाल्लेल्या भाजपासाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक म्हणजे अक्षरश: जीवनमरणाचा प्रश्न आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावीच लागेल. या निवडणुकीतील पराभव म्हणजे केंद्रातील भाजपा सरकारच्या पतनाची नांदी ठरण्याची दाट शक्यता आहे. भाजपा नेतृत्वाला आणि त्या पक्षाचा शक्तीस्त्रोत असलेल्या संघ परिवारालाही याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग परिवार बांधणार आहे आणि त्यासाठीच घासून गुळगुळीत झालेले राम मंदिराचे नाणे पुन्हा एकदा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एकूण ७५ पैकी तब्बल ७१ जागा जिंकलेल्या पक्षाने असे घायकुतीला येणे, खरे म्हटले तर खूप आश्चर्यकारक आहे; पण लोकसभा निवडणुकीनंतर गंगेतून भरपूर पाणी वाहून गेल्याची भाजपा व संघ नेतृत्वाला जाणीव आहे. दिल्ली आणि बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही भाजपासमोर दमदार स्थानिक नेतृत्वाच्या व संघटनात्मक बांधणीच्या अभावाचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. नरेंद्र मोदींच्या नावाचा व करिश्म्याचा वापर करून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणे वेगळे आणि विधानसभा निवडणूक वेगळी, याची दिल्ली व बिहारमधील निकालांमुळे भाजपा व संघ परिवाराला पुरेपूर कल्पना आली आहे. त्यामुळेच यावेळी केवळ नरेंद्र मोदींवर विसंबून न राहता, धार्मिक तेढ निर्माण करून त्यावर आपली पोळी शेकून घेण्याचा डाव दिसतो आहे आणि उत्तर प्रदेशात धार्मिक तेढ निर्माण करायची असल्यास राम मंदिरापेक्षा जास्त चांगला मुद्दा दुसरा कोणता असू शकतो? संघ परिवाराचा हा विचार कागदावर अगदी बिनतोड वाटू शकतो, फक्त अडचण एवढीच आहे, की गंगेतून लोकसभा निवडणुकीनंतर जेवढे पाणी वाहून गेले, त्याच्या किती तरी पट पाणी १९९२ नंतर वाहून गेले आहे!
उत्तरप्रदेशची तयारी
By admin | Updated: December 23, 2015 23:26 IST