- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्लीदेशातील सत्तेचे प्रमुख केंद्र असलेल्या उच्चभ्रु, सुप्रतिष्ठित ल्युटन्स दिल्लीतील एकाहून एक उच्चपदस्थ, वजनदार लोक कोरोनाच्या झटक्यासमोर प्रथमच गलितगात्र, केविलवाणे झालेले दिसत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने दिलेला तडाखा एवढा जबरदस्त, की या भल्याभल्यांनाही जावे तरी कोणाकडे, असा प्रश्न पडला आहे. एम्सने जागा नाही, असे त्यांना विनम्रतेने सांगितले जाते. तिनेकशे खाटा असलेल्या सुसज्ज ट्रॉमा सेंटरचे रूपांतर ५ एप्रिलपासून कोविड इस्पितळात करण्यात आले आहे. तेही रुग्णांनी भरून गेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील एक राज्यमंत्री त्यांच्या कोणा आप्ताला खाट मिळावी म्हणून आले; पण दिल्लीत त्यांच्यासाठी कोठेही सोय होऊ शकली नाही.
राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनाही ‘अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आता एकही जागा राहिलेली नाही,’ असे एम्समधून सांगण्यात आले. अखेर त्यांना दिल्ली फरीदाबाद सीमेवरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जावे लागले. भाजपच्या एका खासदाराला एम्समध्ये जागा नाकारण्यात आल्यावर ते इतके भडकले की त्यांनी थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे देशातले बलाढ्य नोकरशहा. तेही एम्समधून नकार घेऊन परतले. माजी केंद्रीय गृह सचिवांच्या जावयाला एका खाजगी रुग्णालयात जागा मिळाली; पण तीही दुसऱ्या रुग्णाबरोबर खोली शेअर करण्याच्या अटीवर! दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांच्या पत्नीला गुरगावच्या मेदान्ता हॉस्पिटलात दाखल व्हावे लागले. त्यांची कन्या आणि जावई घरीच उपचार घेत आहेत. उच्चपदस्थ असणे किंवा त्यांच्याशी संबंध असणे हे सारेच कोविडने निरुपयोगी ठरवले आहे. देशाच्या राजधानीत खरोखरच आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. फोन वाजला तर आता न उचलण्याकडेच कल दिसतो.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांसाठी बहुप्रतीक्षित लसीकरण योजना १५ जानेवारीला सुरू केली. कोविड पथ्ये न पाळल्याबद्दल कायदा करणारे भले जनतेला दोष देतील; पण कारभार करणारे तरी ती कुठे पाळत होते? केंद्रात, राज्यात सगळेच बेबंद सुटले होते. मुखपट्टी न वापरणारांना शिक्षा करणे पोलिसांनी बंद केले. साथरोग तज्ज्ञ, विषाणू शास्त्रज्ञ कोविड पथ्ये न पाळणे महाग पडेल, असे सरकारला वारंवार सांगत होते. विषाणूचा ब्रिटिश प्रकार केंव्हाही भारतात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. पंतप्रधानांनी गेल्या फेब्रुवारीत कोविडचा सामना करण्यासाठी नऊ कार्यगट तयार केले होते. या गटांनाही दुसरी लाट येईल हा अंदाज होता. पण, सगळेच अल्पसंतुष्ट सुस्तावले आणि पुढचा खेळ झाला. तेवढ्यात निवडणुका जाहीर झाल्या. भाजपला पश्चिम बंगाल जिंकण्याची खात्री होती. ‘काळजी घ्या आणि औषधही’ ही घोषणा वाऱ्यावर भिरकावण्यात आली. निवडणूक प्रचारातील मिरवणुका, सभा यात कोविड पथ्ये पाळा, असे निवडणूक आयोगाने का बजावले नाही?- आजवर या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. शेवटी २ एप्रिलला साथीचा उद्रेक झाला आणि हाहाकार माजला.