शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण : पिट्सबर्ग आणि चंद्रपूर

By admin | Updated: June 6, 2017 04:20 IST

जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद २००९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया या राज्यातील पिट्सबर्ग येथे भरली होती.

जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद २००९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया या राज्यातील पिट्सबर्ग येथे भरली होती. त्या परिषदेसाठी त्या शहराची निवड करण्याचे कारण प्रदूषणाने त्याची केलेली वाताहत आणि त्या पडझडीतून त्याने घेतलेली उभारी हे होते. एक शहर वा राष्ट्र आपल्या परिश्रमाने सर्व क्षेत्रात केवढी उंची गाठू शकते याचा पिट्सबर्र्गने घालून दिलेला आदर्श तेव्हाचे अध्यक्ष बराक ओबामा यांना जगातील राष्ट्रप्रमुखांना दाखवायचा होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला लागणाऱ्या पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, कोळसा, मँगेनीज आणि तशाच साऱ्या खनिजांनी पिट्सबर्र्र्ग समृद्ध होते. त्या काळात त्या शहराभोवती जे प्रचंड उत्खनन होऊन त्याच्या पर्यावरणाचा जो विध्वंस झाला त्यात त्यातली हजारो माणसे मृत्युमुखी पडली. हजारोंनी ते शहर सोडले. कामगारांपाठोपाठ खाण मालकांनाही इतर शहरांचा आश्रय घ्यावा लागला. पाहता पाहता सहा लक्ष लोकसंख्या असलेल्या पिट्सबर्र्गमध्ये मग अवघे २० हजार लोक उरले. त्यांची घरे, चर्चेस, पूजास्थाने आणि स्मारके तशीच राखेच्या ढिगाऱ्यांखाली वर्षानुवर्षे राहिली. एका जिवंत शहराचे स्मशानात रूपांतर होऊन गेले. मग त्या ऐतिहासिक शहराचे देशावरील उपकार स्मरून अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी त्याच्या नव्या उभारणीची सुरुवात या शतकाच्या आरंभी केली. आज ते अमेरिकेतले एक सुंदर व देखणे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तेथील तीन नद्यांच्या पाण्याचा वापर तेथील व्यवस्थेने ज्या कल्पकतेने केला त्यामुळे शहर केवळ हिरवेगारच झाले नाही तर त्याच्या रस्त्यांच्या कडेने सशांचे थवे धावताना दिसू लागले. त्याची लोकसंख्या आता तीन लाखांवर गेली आहे. जी-२० परिषदेला आलेल्या भारताच्या डॉ. मनमोहनसिंगांसह सगळ्याच राष्ट्रप्रमुखांनी त्याच्या या कायापालटाची मनापासून प्रशंसा केली. काल झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या शहराची स्फूर्तिदायी आठवण साऱ्यांना होणे स्वाभाविक आहे. त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशात असलेले चंद्रपूर शहर हे जगातील प्रदूषणाचे सर्वात मोठे केंद्र बनले असल्याच्या दुसऱ्या दुर्दैवी बाबीचा उल्लेखही येथे करणे भाग आहे. दीड डझनांहून अधिक कोळसा खाणी आणि तेवढ्याच संख्येने त्या शहराभोवती उभ्या झालेल्या सिमेंटच्या कारखान्यांनी त्याचे पर्यावरण पार काळेकुट्ट करून टाकले आहे. इंटरनेटच्या पडद्यावर हे शहर दिसेनासे करणारा काळ्या ढगांचा डाग त्यावर पाहता येणारा आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या आक्रोशाचा विषय व्हावा असे हे प्रकरण आहे. त्यातून त्या शहरात कोळशावर वीजनिर्मिती करणारे अजस्र प्रकल्प आहेत. शहरातून कोळसा वाहून नेणाऱ्या हजारो मालमोटारी तेथे आहेत. या साऱ्या भीषण परिस्थितीची वेळीच काळजी न घेतल्याने त्या शहरातील व त्याच्या सभोवतीच्या गावांतील ७० टक्क्यांएवढी अल्पवयीन मुले श्वसनाच्या व फुफ्फुसाच्या आजाराने बाधित झाली आहेत. शहरात मोठे रोग साथीच्या आजारासारखे पसरू लागले आहेत. वैद्यकीय व्यवसाय जोरात आणि शहरातली औषधांची दुकाने ग्राहकांनी भरली आहेत. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यस्तरावरील कॅबिनेट मंत्री, सत्ताधारी पक्षाचा आमदार, त्याच पक्षाची महापालिका आणि जिल्हा परिषद असे सारे असताना आणि अतिशय कार्यक्षम अधिकाऱ्यांचा वर्ग तेथे एकवटला असतानाही चंद्रपूर शहरावरचे हे काळे संकट त्यांना दूर करता येत नसेल तर त्यांच्या प्रयत्नात केवळ अपुरेपणाच नव्हे तर खोट आहे असेच म्हणणे भाग आहे. पर्यावरण रक्षकांच्या अनेक संघटना व चळवळी तेथे कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांची व स्थानिक अल्पवयीन मुलांच्या आजारांची दखल गंभीरपणे घ्यावी असे सरकारला अजून वाटत नाही. राजकारण्यांना त्याचे घेणे-देणे नाही. मात्र ज्यांच्या घरातली मुले या प्रदूषणाने बाधित झाली आहेत त्यांच्या व्यथा मोठ्या आहेत. शहरात प्रवेश करतानाच ते काळ्या धुराने वेढले आहे याची जाणीव तेथे येणाऱ्या प्रत्येकाला होते. सायंकाळी तर हा धूर अधिक गडद होतो आणि कोळशाचे बारीक कण जमिनीवर अंथरल्यासारखे पडलेले दिसतात. पिट्सबर्गची आरंभीची दुर्दैवी कहाणी कोणत्याही जाणकाराला आता चंद्रपूर किंवा वणीसारख्या शहरांत अनुभवता येणारी आहे. या प्रकाराला आळा घालणे वा त्यासाठी प्रयत्न करणे अजूनही कोणाला गरजेचे व तातडीचे न वाटणे हा यातील सर्वात गंभीर प्रकार आहे. अमेरिकेसारखे जगातील सर्वात मोठे प्रदूषक राष्ट्र आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी १९५ देशांनी केलेल्या पॅरिस करारातून बाहेर पडले आहे. त्यावर होणाऱ्या टीकेची त्याला पर्वा नाही. त्याचे अध्यक्ष ट्रम्प याबाबत जेवढे निर्ढावले आहेत तेवढीच चंद्रपूर शहरातील राजकारणी माणसे त्यातल्या प्रदूषणाच्या जीवघेण्या संकटाबाबत बेपर्वा व बेजबाबदार राहिली आहे. लोक चर्चा करतात; पण त्याची कर्त्या माणसांना दखल घ्यावीशी वाटत नाही. पीटर हॉकिंग्ज हा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ म्हणतो, प्रदूषणाच्या जागतिक संकटाने पृथ्वीवरील माणसांचे आयुष्य आणखी केवळ १०० वर्षे टिकेल. या हिशेबात देशातील व महाराष्ट्रातील चंद्रपूर या सर्वाधिक प्रदूषित शहराचे आयुष्य कितीसे आहे याचे गणित मांडण्याची व त्याचे उचित उत्तर शोधण्याची त्या शहराच्या व राज्याच्या नेत्यांची जबाबदारी आहे.