शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मुंबईत सिमेंट राेडचे राजकारण, दुबईत हिरवे गालिचे!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 23, 2023 06:06 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावरून वाद सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावरून वाद सुरू आहेत.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ मुंबईतील रस्ते चकाचक होतील. सोयी-सुविधा जागतिक दर्जाच्या असतील, असा होता. या गोष्टीला अनेक वर्षे उलटून गेली. मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. चालण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. कचऱ्याचे ढीग संपत नाहीत. फूटपाथवरची अतिक्रमणे कमी होत नाहीत. आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. एखादी चांगली सुविधा निर्माण झाली म्हणून त्याचा आनंद घ्यायचा ठरवले, तर त्याचे फोलपण लगेच लक्षात येऊ लागते. पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करून या शहराचे नियोजन झालेले नाही. कोणत्या भागात किती एफएसआय द्यायचा त्याला मर्यादा आहेत. मात्र, या मर्यादांचा विचार गंभीरपणे होत नाही. महालक्ष्मी स्टेशनजवळील सात रस्ता परिसराचे उदाहरण पुरेसे आहे. या ठिकाणी मोठ-मोठे टॉवर उभे राहिले. मात्र, रस्त्यांची रुंदी आहे तेवढीच राहिली. किंबहुना त्यावरही अतिक्रमणे वाढली. त्याच रस्त्यांवरून मेट्रो जात आहे. त्याच भागात अचानक रस्ता खचून पंधरा-वीस फुटांचे खोल खड्डेही पडत आहेत. जर नियोजन करून या भागात टॉवर बांधायला परवानगी दिली असती तर ही वेळ आली नसती. मुंबईत अशी अनेक उदाहरणं देता येतील. 

मिलन सबवेच्या ठिकाणी बनविण्यात आलेला पूल हा अंधेरी, सांताक्रुझ, जुहू या भागांतील लोकांना दक्षिण मुंबईत जाता यावे यासाठी केला. मात्र, तो उड्डाणपूल मुंबईच्या दिशेने न जाताविरुद्ध दिशेने जातो. डोमेस्टिक एअरपोर्टच्याजवळ तो उतरतो. याचा अर्थ विमानतळाच्या समोरील उड्डाणपुलाच्या खालपर्यंत जायचे, आणि तेथून वळसा घालून पुन्हा दक्षिण मुंबईच्या दिशेने यायचे. जिकडे जायचे आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला उतरणारा हा देशातला एकमेव पूल असेल. सांताक्रुझ ते चेंबूर उड्डाणपूल असाच एकमेव आहे. ज्या- ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती सुरू होते, त्या ठिकाणी हा उड्डाणपूल उतरतो. जिथे लोकवस्ती नाही त्या ठिकाणी तो पुन्हा सुरू होतो. असा उड्डाणपूल बांधायला तेरा वर्षे लागली. दृष्टी आणि नियोजन नसले की काय होते याची ही सगळी उत्तम उदाहरणे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायचे त्यावरून वाद सुरू आहे. यासाठी ६,०७९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. एक किलोमीटर लांबीचा रस्ता जवळपास १५.१९ कोटी रुपयाला पडणार आहे. या कामास विलंब झाला तर खर्चात वाढ होत जाईलच. विरोध ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे करण्याला नाही. मात्र, हे रस्ते ज्या भागातून जाणार आहेत, त्या भागात असणाऱ्या इमारतींना भविष्यात किती एफएसआय दिला जाणार आहे? त्या ठिकाणी किती मोठ्या इमारती उभ्या राहतील? त्या इमारतींचा ताण या रस्त्यांवर किती वर्षात, किती प्रमाणात वाढेल? आणि तो वाढला तर या रस्त्यांची उपयुक्तता राहील का? या प्रश्नांची उत्तरे कोणीही देत नाही. उलट वरवरचे राजकीय प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला उत्तरे देखील तशीच उथळपणाने दिली जातात. 

दुबईसारखे शहर आपल्या राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जाऊन बघितले पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा केलेली निसर्गाची उधळण पाहिली पाहिजे. उन्हाळ्यात दुबईमध्ये तापमान ५० अंशांपर्यंत जाते. अशावेळी रस्त्याच्या कडेला लावलेली फुलझाडे किंवा गवत वाळून जाऊ नये यासाठी ड्रिप इरिगेशनची कायमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

रस्त्याच्या दुतर्फा अशा गवतांच्या गालिचांवर मुक्तपणे पक्ष्यांचे थवे येऊन बसतात. तुम्हा आम्हालाही तिथे जाऊन बसावे वाटेल, इतके सुंदर वातावरण रस्त्याच्या कडेला दिसते. अबुधाबीला दिवंगत राष्ट्रपती शेख जायद बिन सुलतान अल नहयान यांनी १९९४ मध्ये भव्य मशीद उभारण्याचे काम सुरू केले. ३० एकरपेक्षा मोठ्या जागेमध्ये ही मशीद आहे.

 ‘शेख जायद ग्रँड मज्जिद’, या नावाने ती ओळखली जाते. हिच्या संपूर्ण परिसरात कुठेही तुम्हाला एकही टपरी दिसणार नाही. चहाचा ठेला दिसणार नाही. सर्वत्र सुंदर पाना-फुलांची आकर्षक रचना दिसेल. त्या ठिकाणी असणारी कलादालनं समुद्रकिनारी आहेत. ती ज्या पद्धतीने बांधलेली आहेत, ते आवर्जून बघितले पाहिजे. देशात सगळ्यात जास्त आर्ट गॅलरी मुंबईत आहेत. मात्र, त्यांची अवस्था आणि तिथे असणाऱ्या सोयीसुविधा यांची तुलना जर दुबईतल्या आर्ट गॅलरींसोबत केली, तर वाईट वाटण्यापलीकडे हाती काही येत नाही. 

आज मुंबईतला एकही रस्ता बिना खड्ड्याचा नाही. बिना अतिक्रमणाचा फूटपाथ नाही. कचऱ्याचा ढीग नसलेला रस्ता नाही. चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची ही अवस्था होऊ नये. हे रस्ते तरी निदान एवढा प्रचंड पैसा खर्च करून होत असतील तर ते जागतिक दर्जाचे असावेत, अशी अपेक्षा केली तर ती माफक समजली जावी. ‘आमच्याकडे नियम बनवणारे, नियम मोडत नाहीत’, असे सांगणारे असंख्य लोक दुबईत सापडतील. आपल्याकडे नियम मोडण्यासाठीच असतात, असा अलिखित नियम अंमलात आणून दाखवणारे हजारो सापडतील. हे थांबवायचे की राजकीय चिखलफेक करण्यातच धन्यता मानायची हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे.